● सिव्हील सर्जन आज काढणार नोटिसा
● जम्बोला सॉफ्ट कार्नर देणारे नक्की कोण?
विशेष प्रतिनिधी “तरुण भारत” / सातारा :
कोरोना महामारीमध्ये प्रशासनाच्या विरोधात कोणीही ब्र शब्द काढायचा नाही, अशी भितीच प्रशासनाने घातली गेल्याने कोणीही विरोधात बोलत नाही. त्याचाच गैरफायदा घेत प्रशासनाकडून अनेक घोटाळे या कोरोना महामारीच्या काळात सुरु आहेत. ‘तरुण भारत’ने अचुक बातमीच्या माध्यमातून गेल्या पंधरा महिन्यामध्ये अनेक घोटाळे उघडकीस आणले आहेत. नुकताच मृत्यूचा आकडा उशिरा अपलोड केल्याचा घोटाळा उघडकीस आणला असून ज्या रुग्णालयात रुग्ण मृत्यू झाला आहे अन् त्याची माहिती वेळेवर भरली गेली नाही त्या रुग्णालयांना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांच्याकडून कारणे दाखवा नोटीस काढण्यात येणार आहे.
दरम्यान, मृत्यूच्या अपलोड घोटाळय़ामध्ये वाणगीदाखल दाखवलेल्या 28 रोजीच्या अहवालात खाजगी हॉस्पिटलसह साताऱयातील जम्बो हॉस्पिटालच्या चुकांचा मोठा भरणा आहे. एकाच दिवशी त्यानी 23 मृत्यूचे आकडे चुकवले होते. त्यामुळे सातत्याने आणि नवनविन चुका करणाऱ्या जम्बोच्या प्रशासनाला ‘सहकार्य’ नक्की कोणाचे हा महत्वाचा प्रश्नही कायमच अनुत्तरित रहात आहे.
बाधितांचे आकडे वेळच्या वेळी न भरल्याने पॉझिटिव्हीटी रेट वाढून जिल्हय़ावर लॉकडाऊन लागला होता. मात्र ‘तरुण भारत’ने तो घोटाळा बाहेर काढत सातारा जिल्हय़ाला शिथिलता मिळवून दिली होती.
प्रशासनाकडून एका बाजूला उपाययोजना सुरु असल्या तरी दुसऱ्या बाजूला चुका होत आहेत. त्या चुकांमुळे सातारा जिल्हावासियांना उगाच बंधनात रहावे लागत आहे.
गेल्या पंधरा महिन्यांमध्ये लॉकडाऊन काळात अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. गेल्या पंधरा महिन्यांमध्ये अचूक बातमीच्या माध्यमातून सातारकरांना ‘तरुण भारत’ने अचूक माहिती दिली गेली आहे. गेल्या तीन दिवसांपूर्वी अचानक मृत्यूदर वाढला गेला. दि. 28 रोजी मृत्यू संख्या 46 दाखवण्यात आली. याबाबत ‘तरुण भारत’ने माहिती घेतली असता 20 जुलै ते 26 जुलै दरम्यान मृत्यू झालेल्या नागरिकांचे अहवाल दि. 28 रोजी दिले होते. मागच्या तारखेला मृत्यू झालेल्यांची नोंद असताना दि. 28 रोजी प्रसिद्धी माध्यमांना दिली आहे.
‘तरुण भारत’ने या घोटाळयाचे वृत्त प्रसिद्ध करताच प्रशासनाची तारांबळ उडाली आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांच्याकडून ज्या रुग्णालयांनी माहिती अपलोड करण्यास उशीर केला गेला त्या रुग्णालयास कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार आहे, त्याची माहिती घेण्याचे काम सुरु आहे, असे सांगितले.
तर हॉस्पिटलस् बंद करण्याची तरतुद आहे
वास्तविक अशा चुका करणाऱ्या हॉस्पिटल्सवर बंदी आणण्याची तरतुद आहे मात्र जिल्हा प्रशासनाकडून कडक कारवाई होणे अशक्यच असल्याच्या रविवारी प्रतिक्रिया येत होत्या. सुरूवातीपासूनच लोकांना धाकात ठेवण्यापेक्षा कडक अंमलबजावणी न केल्यानेच जिल्हय़ात अरिष्ठ बळावत गेल्याचे आता खुलेआम बोलले जात आहे. त्यामुळेच आता या मोठय़ा चुकांबाबत प्रशासन काय भुमिका घेणार याकडे साऱयांचे लक्ष आहे.
रविवारी केवळ तोंडी चर्चा अन् व्हॉटसऍप
‘तरुण भारत’ने हा घोटाळा रविवारी काढला ना…. रविवारी जिल्हाधिकारी कार्यालय बंद मग कशी होणार कारवाई? अशी विचित्र प्रतिक्रिया एका अधिकाऱयाने दिली. त्यावर रविवारी काय कोरोना सातारा जिल्हय़ातून गायब होतो का? या ‘तरुण भारत’च्या प्रश्नावर मात्र संबंधिताने डोक्यावर हात मारत पळ काढला.
जिल्हा रुग्णालयासह जम्बोलाही निघणार नोटीसा
मागच्या तारखेला झालेले मृत्यूची नोंद उशिरा भरल्याप्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण हे कारण दाखवा नोटीसा काढणार असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. यामध्ये जम्बोमध्ये 23 जणांचा मृत्यू असल्याने त्या रुग्णालयामध्ये ज्यांनी माहिती भरण्यास उशीर केला त्यांच्यावर कारणे दाखवा नोटीस काढण्यात येणार असल्याने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण नेमकी कोणाला नोटीस बजावणार आहेत. अशीही चर्चा जिल्हा रुग्णालयात सुरु होती. या रुग्णालयाच्या विभाग प्रमुखांना नोटिस निघाली तर मात्र जम्बोच्या प्रशासनाला पुन्हा एकदा सॉफ्ट कार्नर दिल्याचे स्पष्ट होणार आहे.
- दीपक प्रभावळकर
9325403232
9527403232