नेत्यांसह कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याचे अजितदादांचे आदेश
प्रतिनिधी/ सातारा
येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत कोणासोबत आघाडी होणार हे तुम्ही आम्हाला विचारत बसू नका. तुम्हाला स्वतंत्र लढायचे आहे असे समजून कामाला लागा. जर उद्याच्याला ठाकरे साहेबांच्या शिवसेनेबरोबर जायचे असेल, काँग्रेसबरोबर जायचे असेल तर राज्य पातळीवर ते निर्णय होतील. पण येथे 1999 पासून सातत्याने आपण राष्ट्रवादी काँग्रेस म्हणूनच निवडणुका लढवलेल्या आहेत. त्याकरता पायाला भिंगरी लावून सगळय़ांनी पळा, असे फर्मानच काढत विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी घोषणा केली.
कोरेगाव तालुक्यातील सोळशी येथे आयोजित कार्यक्रमात ते सायंकाळी उशिरा बोलत होते. यावेळी विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, आमदार शशिकांत शिंदे, आमदार मकरंद पाटील, जिल्हाध्यक्ष सुनील माने यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी अजित पवार म्हणाले, उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होतील. तुम्ही आम्हाला विचारत बसू नका. कोणासोबत आघाडी होणार आहे ते. तुम्हाला स्वतंत्र लढायचे आहे असे समजून कामाला लागा. जर उद्याच्याला ठाकरे साहेबांच्या शिवसेनेला बरोबर घ्यायचे असेल काँग्रेसला बरोबर घ्यायचे असेल तर राज्य पातळीवर ते निर्णय होतील. इथल्या निवडणुका 1999 च्या नंतर सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून आपण लढवलेल्या आहेत. त्या सातारा जिह्याच्या असतील, पुणे जिह्याच्या असतील, ज्या ज्या ठिकाणी आपल्या पक्षाची ताकद जास्त आहे. तिथे तिथे आपण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका एकटय़ा पक्षाच्या ताकदीवर लढवल्या आहेत. त्यामुळे याची नोंद सर्वांनी घ्यावी. सुनील माने यांच्यासह सगळय़ांनी पायाला भिंगरी बांधल्यासारखे फिरले पाहिजे, अशी घोषणा त्यांनी केली.
अजितदादांनी आदेश देताच जिल्हा राष्ट्रवादी कार्यालयात शुक्रवारी बैठक
सोळशीमध्ये अजितदादांनी अगदी शिक्षण विभागात सेवा बजावणाऱया पण राजकीय व्यासपीठाचे उत्तम असे सूत्रसंचालन करणाऱया सूत्रसंचालकांस सोडले नाही. त्यांनी पटापटा नावे घे अशा शब्दात सूचना देत जिह्याच्या अख्ख्या राष्ट्रवादी काँग्रेसला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने तयारीला लागा असे स्पष्ट आदेश देताच शुक्रवारी राष्ट्रवादी कार्यालयात तातडीची बैठक घेण्यात आली. त्याबैठकीला जिह्यातील महत्वाचे पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीमध्ये नेमके काय झाले हे समजू शकले नाही. मात्र, पत्रकारांशी बोलताना रामराजे, शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील, मकरंद पाटील यांनी येऊ घातलेल्या निवडणुकांच्या अनुषंगाने पूर्वीच नियोजन केल्याची बैठक होती, असे सांगितले.
स्टेट्स 24 तासापुरतेच असते
आमदार जयकुमार गोरेंच्या टीकेवरुन तुम्ही स्टेट्स ठेवला होता, असा रामराजेंना पत्रकारांनी प्रश्न छेडला असता रामराजे म्हणाले, स्टेटस हा स्टेटस असतो तो चोवीस तासांनी जातो. ते राष्ट्रीय पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांनी काय बोलावे. मोदी साहेबांनी त्यांना अजेंडा दिला असेल की रामराजेंच्यावर बोला म्हणून, त्यांना केंद्रीय कार्यालयातून जशा सूचना असतील तसे ते बोलत असतील. हिंदूत्वाचा अजेंडा असेल ते वाढवत असतील. जेव्हा कारवाई होईल तेव्हा बोलू आताच काय, असेही रामराजेंनी उत्तर दिले. तसेच राष्ट्रवादीची ताकद कमी झाली आहे त्याबाबत तुमची रुपरेषा काय असेल या प्रश्नावर रामराजे म्हणाले, तुमचा प्रश्नच समजला नाही. पुन्हा म्हणजे आता ताकद नाही का?, आमची ताकद आहेच, आम्हाला ती संघटित करायची आहे, असा दावा त्यांनी केला. दरम्यान, आमदारांची संख्या कमी झालेली आहे, त्याबाबत काय या प्रश्नावर ते तो विषय वेगळा आहे, असे सांगत सगळे नवीन दिसतात, असा उपस्थित पत्रकारांनाच त्यांनी प्रश्न केला.
जिह्यात राष्ट्रवादी तळागाळात आहे
मुळात राष्ट्रवादी जिह्यात तळागाळात आहे हे वेळोवेळी सिद्ध झालेले आहे. त्यामुळे आज बसलो ते चार दिवसांपूर्वी ठरले होते. तो दादांनी सांगितले म्हणून हा निव्वळ योगायोग आहे. त्या बैठकीत तालुका पातळीवर बुथ कमिटय़ांच्या अनुषंगाने चर्चा झाली, अशी माहिती माजी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी यावेळी दिली.