वार्ताहर/ चिकोडी
चिकोडी शहरातील सर्व व्यापाऱयांनी गेल्या दीड-दोन महिन्यांपासून आपली दुकाने नियमानुसार व नगरपरिषदेच्या सूचनेनुसार बंद ठेवून कोरोना संसर्गाच्या फैलावाला आळा घालण्यास जे सहकार्य केले आहे, ते खरोखरच अभिनंदनीय आहे. यापुढे शहरातील सर्व व्यापाऱयांनी आपल्यासह कुटुंबाला कोरोनाची लागण होऊ नये, यासाठी योग्य ते नियमांचे पालन करून आपले व्यवहार सकाळी 9 ते सायंकाळी 6 पर्यंत सुरू करावेत, असे आवाहन राज्य सौहार्द फेडरेशनचे उपाध्यक्ष व नगरसेवक जगदीश कवटगीमठ यांनी केले.
येथे नगरपरिषदेच्या आवारात चिकोडी शहरातील विविध व्यापाऱयांच्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर बोलावण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. कवटगीमठ पुढे म्हणाले, चिकोडी शहरातील सर्व दुकानदारांनी सोमवार 18 मे पासून आपली दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 6 पर्यंत सुरू ठेवावीत, सामाजिक अंतर राखण्याच्या दृष्टीकोनातून दुकानासमोर बॅरिकेड्स उभारावेत, मास्क, हॅन्डग्लोज व सॅनिटायझरचा वापर करावा, एकहून अधिक ग्राहकांना एकाचवेळी दुकानात प्रवेश देऊ नये. तसेच आजपर्यंत नगरपरिषदेला जे सहकार्य दिले ते यापुढेही कायम ठेवावे, अशा सूचनाही त्यांनी केल्या.
गेल्या एक महिन्यापासून शहरात सामाजिक अंतर राखण्यावर भर दिल्यानेच शहरात एकही कोरोनाचा रुग्ण सापडलेला नाही. येत्या काही महिन्याच्या कालावधीतही व्यापाऱयांनी सांभाळून रहावे, असेही आवाहनही त्यांनी केले. प्रारंभी मुख्याधिकारी सुंदर रुगी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी नगरसेवक गुलाब बागवान, साबीर जमादार, संजय कवटगीमठ, नागराज मेदार, सोमनाथ गवनाळे यांच्यासह सर्व व्यापारी उपस्थित होते.