फिरोज मुलाणी / सातारा :
आषाढी एकादशीला आळंदीहून मजल दरमजल करीत निघालेल्या पालख्या पंढरीत पोहचतात. विठू माऊलींच्या दर्शनासाठी तहान भूक हरपून दररोज माऊलींच्या दिशेने पायी कूच करणाऱया वारकरी भक्तांना पांडुरंगाच्या मंदिराचा कळस पाहिल्यावर आनंदाला पारावर रहात नाही. वारकरी सांप्रदायाचे भक्त भान हरपून जातात. अगदी अशीच स्थिती मल्ल आणि कुस्तीशौकिनांची झाली आहे. तब्बल दोन वर्षानंतर यंदा छत्रपतींच्या राजधानीत अजिंक्यताऱ्याच्या कुशीत लपलेल्या छत्रपती शाहू स्टेडियमवर यंदा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे राज्यस्तरीय अधिवेशन म्हणजे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची दंगल रंगणार आहे. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा म्हणजे मल्ल आणि कुस्तीशौकिनांच्यासाठी अनोखी पर्वणी असते. कुस्तीगीरांच्या मेळ्यात केवळ स्पर्धेत सहभागी होणारे मल्लच नव्हे तर राष्ट्रीय पदक विजेते हिंदकेसरी आणि महाराष्ट्र केसरी किताबाचे मानकरी जुन्या पिढीतील नामवंत मल्ल आवर्जून अधिवेशनात हजेरी लावतात. मैदानातील आखाडय़ात रंगतदार लढतीचा थरार रंगत असला तरी मैदानाच्या बाहेर मात्र अनेक वर्षानंतर भेटलेले जुने मल्ल यांच्यात गप्पांचा फड रंगून गेला होता.
लाँर्डसवर ऐतिहासिक हिरवळीवर शतक ठोकावे असे क्रिकेटपटूचे स्वप्न असते विंबल्डनमध्ये पदक जिंकावे याकरिता टेनिसपटू जीव ओतून खेळतात अगदी तसेच महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रातील मानाची कुस्ती स्पर्धा म्हणजे महाराष्ट्र केसरी स्पर्धा होय. लाल मातीच्या आखाडय़ात पाय टाकल्यापासून आपल्या पोराने महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत खेळावे हे पैलवानांच्या बापाने स्वप्न उराशी बाळगलेले असते. हे स्पर्धेतही स्वप्न साकार होताना मल्ल आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना होणारा आनंद वेगळाच असतो. त्यामुळे दरवर्षी ही मानाची कुस्ती स्पर्धा व्हावी यासाठी कुस्तीशौकिनांना आस लागलेली असते. महाराष्ट्र आणि कुस्ती हे समिकरण अतिशय घट्ट आहे. मराठमोळी अस्सल मर्दानी संस्कृती आजही ग्रामीण भागात जपण्याचा कसोशीने प्रयत्न केला जात आहे. राजाश्रय संपल्यानंतर मोडकळीस आलेली कुस्ती लोकाश्रयामुळे अधिक फुलली आहे. सहकारी संस्थाचा कुस्ती वाढवण्यात मोठे योगदान आहे. कुस्तीच्या वेडापायी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जुने जानते मल्ल आज सातारच्या आखाडय़ात दाखल झाले आहेत. छ. शाहू स्टेडियमवरील महाराष्ट्र केसरीचे आखाडे पाहून अनेकजण हरखून गेले आहेत. मल्लांनी आखाडय़ातील लाल माती आपल्या कपाळी लावून जणू सातारच्या मेळ्यात पोहोचल्याचे समाधान व्यक्त केले आहे.
कुस्ती क्षेत्राच्या विकासासाठी स्पर्धा
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा ही केवळ मल्लांच्या लढतीपुरती मर्यादित नाही. राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धेत कुस्तीगीर परिषदेची वार्षिक सर्वसाधारण सभा होत असते. परिषदेचे अनेक पदाधिकारी स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित राहतात. कुस्तीचा विकास होण्यासाठी अनेक धोरणात्मक निर्णय स्पर्धेत घेतले जातात. शासनदरबारी मल्लांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी चर्चा होत असते. राज्याचा राज्यकारभार चालवणारे अनेक मंत्रीमहोदय स्पर्धेसाठी उपस्थित रहात असल्याने राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर येणाऱया समस्या मांडता येतात. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राचे मल्ल पोहचले पाहिजेत यासाठी ग्रामीण पातळीवर पायाभूत सुविधा उभा करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनाबद्दल देखील अधिवेशनात निर्णय घेण्यात येतात. त्यामुळे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा म्हणजे पैलवान आणि कुस्ती क्षेत्राच्या विकासासाठी अनन्यसाधारण महत्व असलेली स्पर्धा आहे. त्यामुळे पैलवानांच्या ऐतिहासिक मेळ्याला हजेरी लावण्यासाठी राज्याच्या वेगवेगळ्या भागातून आलेल्या मल्ल, वस्ताद, प्रशिक्षक, पंच आणि कुस्तीशौकिनांच्या दिंडय़ा आज राजधानीत दाखल झाल्या आहेत. मूळात आयोजकांनी केलेल्या प्रचार आणि प्रसारामुळे कुस्तीचे वातावरण निर्माण झाले आहे. तब्बल साठ वर्षानंतर सातारला राज्यस्तरीय अधिवेशन होत आहे. स्पर्धेसाठी आता सर्वत्र मल्लांचे जथ्थे जमा झाल्यामुळे प्रत्यक्ष या स्पर्धेला अधिकच रंग चढेल.