स्मशानभूमीसमोरची परिस्थिती, विदारक दृश्याने साऱयांचेच मन हेलावतेय
प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोनाग्रस्त रुग्णांना उपचार मिळविण्यासाठी धडपड करावी लागत आहे. मात्र वेळेत आणि योग्य उपचार मिळाले नाहीतर परिस्थिती गंभीर होऊन मृत्यूही होत आहेत. त्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठीही मोठी धडपड करावी लागत आहे. खरोखरच इतकी गंभीर परिस्थिती कधीच निर्माण झाली नव्हती ती बेळगावमध्ये आता निर्माण झाली असून स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यासाठी रांगा लागल्या आहेत. मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांना नाव नेंदणी करुन तब्बल दोन ते तीन तास वाट पहावी लागत आहे. यामुळे अक्षरशः प्रत्येकाचे मन हेलावून जात आहे. तेव्हा नागरिकांनी कोरोनाचे सर्व नियम पाळून खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
इतके विदारक दृश्य स्मशानभूमीसमोर दिसून येत आहे. तरी देखील नागरिकांमध्ये याचे गांभीर्य नाही ही बाब खरोखरच मनाला वेदना देणारी आहे. हॉस्पिटलमध्ये बेड देता का हो बेड, म्हणण्याची वेळ आली आहे. ऑक्सिजन नाही, रेमडेसिवीर इंजेक्शन नाही, खासगी हॉस्पिटलचा खर्च परवडणारा नाही, आपल्या एका चुकीमुळे आपले कुटुंब उद्ध्वस्त होताना दिसत आहे. अवघ्या आठ ते दहा तासांमध्ये एकाच कुटुंबातील तीन ते चार व्यक्ती दगावत आहेत. ही बाब गंभीर आहे. तेव्हा भले उपचार मिळो अथवा न मिळो मात्र कोरोनापासून बचाव करण्याच्या ज्या पद्धती आहेत किंवा ज्या नियमावली आहेत त्याचे काटेकोरपणे पालन करणे ही काळाची गरज बनली आहे.
लॉकडाऊन काळात देखील दुकानांसमोर खरेदी करण्यासाठी गर्दी दिसत आहे. भाजीपाला किंवा इतर वस्तू खरेदी करण्यासाठी काही ठिकाणी प्रचंड झुंबड उडत आहे. खरोखरच बेळगावची जनता इतकी बेजबाबदार का झाली आहे? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे. कोरोनाच्या उद्रेकामुळे उद्भवणारी परिस्थिती पहायची असेल तर एकवेळ स्मशानभूमीकडे चक्कर मारावी. त्या ठिकाणी हेलावणारी मने तुम्हाला दिसतील. आपणाला 10 किंवा 15 दिवस कोणतीही वस्तू मिळाली नाही म्हणून काहीच फरक पडणार नाही. पण खरेदीसाठी किंवा इतर समारंभासाठी जाऊन स्वतःचा आणि कुटुंबीयांचे जीव कितपत धोक्मयात घालावे हे आता ज्याने त्यानेच ठरविणे गरजेचे बनले आहे.
कोरोना झाल्यानंतर रुग्ण भीतीनेच गर्भगळीत होत आहेत. अनेक तज्ञ डॉक्टरांनी सांगितले आहे की, कोरोना हा पूर्ण बरा होतो. मात्र त्यासाठी सुरूवातीपासूनच उपचार घेणे गरजेचे आहे. काही दिवस अंगावरच काढणे हेच महागात पडताना दिसत आहे. हॉस्पिटलमध्ये रुग्णांना उपचारासाठी धडपड करावी लागते. दुर्दैवाने रुग्णाचा मृत्यू झाल्यास स्मशानभूमीमध्ये देखील अंत्यसंस्कार करण्यासाठी धडपड करावी लागत आहे. अशी भयानक परिस्थिती निर्माण झाली असून जनतेने गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे.
सध्याची विदारक परिस्थिती पाहून तरी बेळगावची जनता खबरदारी घेणार काय? हे पहावे लागणार आहे. मला काही झाले नाही असे कोणीही आपल्या अविर्भावात राहू नये. कारण काळजी घेणे हाच पर्याय आहे. मास्क, सॅनिटायझरचा वापर आणि सुरक्षित अंतर हे हवेच आहे. अन्यथा आपणालाही त्याचा फटका बसू शकतो. तेव्हा कोरोना रोखण्यासाठी नियमांचे पालन करा, असेच आवाहन करण्यात येत आहे.