ऑनलाईन टीम / मुंबई :
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी टाकलेल्या ‘लेटर बॉम्ब’नंतर अखेर गृहमंत्री अनिल देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला आहे. सचिन वाझेंना गृहमंत्र्यांनी महिन्याला 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप परमबीर सिंग यांनी केला होता. त्याबाबत ॲड. जयश्री पाटील यांच्या याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयानं ‘सीबीआय’ चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यानंतर अनिल देशमुख यांनी अखेर गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला. याप्रकरणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी महाविकासआघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुखांनी अखेर राजीनामा दिला. पण आता प्रश्न उरतो की, नवा वसूली मंत्री कोण? असा सवाल चित्रा वाघ यांनी केला आहे. तसेच एखादा चेहरा बदलल्याने महाविकासआघाडी सरकारचा भ्रष्ट हेतू बदलणार नाही, अशी टीकाही चित्रा वाघ यांनी केली.
दरम्यान, अनिल देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी गंभीर आरोप केलाय. राजीनामा दिल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या शासकीय निवासस्थान आणि कार्यालयात असलेले 100 कोटीच्या प्रकरणाचे पुरावे नष्ट करण्याचं काम सुरु असल्याचं भातखळकर यांनी म्हटलंय. इतकच नाही तर CBI ने याबाबत तातडीने कारवाई करावी, अशी मागणीही भातखळकर यांनी केली आहे.