कोरोना-लॉकडाऊननंतर मोदींची संकल्पना
नवी दिल्ली
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून (आयएमएफ) पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आत्मनिर्भर भारत अभियानाचे कौतुक करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत जे आर्थिक पॅकेज देण्यात आले, त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला मदत झाली. कोरोनाचा वाढता संसर्ग आणि त्यानंतर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे हे अभियान खूप महत्त्वपूर्ण होते, असे आयएमएफने म्हटले आहे.
आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत मोदी सरकारने आर्थिक पॅकेजची घोषणा करण्यात आली होती. कोरोना विषाणू महामारीनंतर पॅकेजची घोषणा केल्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला मोठी मदत मिळाली व घसरण होण्याचा धोका कमी झाला. त्यामुळे हे अभियान आम्हाला महत्त्वपूर्ण वाटते असे आयएमएफचे संचालक गॅरी राईस यांनी स्पष्ट केले आहे. जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये भारताला अधिक महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडावी लागणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यातच आर्थिक पॅकेजची मात्रा दिल्यामुळे भारताची अर्थव्यवस्था सावरली. भारताला ‘मेक फॉर वर्ल्ड’चे उद्दिष्ट साध्य करायचे असेल तर व्यापार, गुंतवणूक आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जागतिक मूल्य साखळीतील महत्त्वपूर्ण धोरणांना प्राधान्य द्यावे लागेल, असेही आयएमएफने म्हटले आहे.