खासदार संभाजीराजेंनी दिला लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना धीर
मुख्यमंत्र्यासोबत चर्चा करण्याचे दिले आश्वासन
प्रतिनिधी / कोल्हापूर
लातूर जिल्ह्यातील मंगसुळी गाव. या गावातून वाहणाऱ्या तेरणा नदीने पात्रच बदलल्याने जवळपास दहा एकर शेतीच वाहून गेली. त्यामुळे हवालदिल झालेले शेतकरी सोमवारी या नदीतच आत्महत्या करायला निघाले. हे दृश्य पाहिल्यानंतर खासदार संभाजीराजे छत्रपतींनी त्यांच्यासमोर जाऊन आत्महत्या करु नका, अशी कळकळीची विनंती केली. मी तुमच्यासोबत आहे, अशा शब्दात धीर दिला. तसेच मदत मिळवून देण्यासंदर्भात थेट मुख्यमंत्र्यांशी संवाद साधतो, असे सांगून संभाजीराजेंनी जवळपास सहा शेतकर्यांना आत्महत्येपासून परावृत्त केले.
संभाजीराजे घटनस्थापनेपासून अतिवृष्टीने नुकसानग्रस्त झालेल्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत. त्यांनी सोमवारी लातूर जिह्यातील निलंगा, औसा, लातूर ग्रामीण तालुक्यातील सुमारे 19 गावातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना धीर दिला.
अतिवृष्टीने मंगसुळी (जि. लातूर) या गावातून वाहणाऱ्या तेरणा नदीने पात्रच बदलले. यामध्ये नदीशेजारी जवळपास 10 एकर शेती आणि त्यावरील पिकही वाहूनच गेली. त्यावर नदीतील गाळ पसरला. शेतीच वाहून गेली असेल तर पंचनामा कसा करायचा? या विवंचनेत पाच ते सहा शेतकऱ्यांनी आत्महत्येचा विचार करत तेरणा नदीचे पात्र गाठले. नुकसानग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्यावर असलेल्या संभाजीराजेंना हे हदयद्रावक दृश्य दिसले. त्यांनी थेट या शेतकऱ्यांजवळ जाऊन मी तुमच्या सोबत आहे, आत्महत्येचा विचार सोडा, अशी कळकळीची विनंती केली. तत्काळ या संदर्भात संबंधित जिल्हाधिकारी व तहसिलदारांना निर्देश दिले. तसेच थेट मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन तुम्हाला मदत मिळवून देण्याचा शब्दही दिला.
…अन्यथा माझ्याशी गाठ
लातूर जिल्ह्यातील सह्याखान चिंचोली येथे ‘एसबीआय’ बँकेत पिक विमा तसेच सरकारी अनुदानासंदर्भात विचारणा करायला गेलेल्या शेतकऱ्यांना उध्दट वर्तन करणाऱ्या बँक अधिकाऱ्यांना संभाजीराजेंनी चांगलेच झापले. शेतकऱ्यांशी सन्मानाने वागा अन्यथा गाठ माझ्याशी आहे? अशा शब्दात त्यांनी कानउघडणी केली. त्यामुळे अधिकारी वरमले. या दौऱ्यात संभाजीराजे यांचे गावोगावी फटाक्यांच्या आतषबाजीत जल्लोषी स्वागत करण्यात आले.