दोडामार्ग / वार्ताहर:
दोडामार्ग तालुका आत्मा कमिटीच्या अध्यक्षपदी आज पुन्हा एकदा प्रेमानंद देसाई यांचीच फेरनिवड करण्यात आली. तर जिल्हास्तरीय आत्मा कमिटीसाठी पत्रकार तथा युवा शेतकरी संदीप देसाई व मोर्ले गावचे माजी सरपंच गोपाळ गवस, यासंह विनिता देसाई, श्रेयाली गवस आदींची समितीने निवड करून शिफारस केली आहे.
प्रेमानंद देसाई यांच्याच अध्यक्षतेखाली झालेल्या आत्मा कमिटीच्या या अध्यक्ष निवड बैठकीला तालुका समितीचे सदस्य तथा जि. प. उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, उपसभापती सुनंदा धरणे, जि. प. सदस्या संपदा देसाई, कृषी अधिकारी स्नेहा शेटे, पं. स. सदस्य बाबुराव धुरी, भिकाजी गणपत्ये, गणेशप्रसाद गवस, संदीप देसाई, श्रेयाली गवस, विनिता देसाई, गोपाळ गवस, चंद्रशेखर सावंत, तीलकांचन गवस, सुधीर दळवी आदीं सदस्य उपस्थित होते. कोविड काळात काम करण्यास संधी मिळाली नसल्याने समितीने आपल्याला एक वर्ष काम करण्याची संधी दिल्यास अधिक जोमाने काम करू असा मनोदय देसाई यांनी व्यक्त केला. त्याला समितीने अनुमोदन दिले. यावेळी जिल्हास्तरीय समितीसाठी तालुक्यातील पांच जणांची शिफारस करण्यात आली.
२७ ला होणार दमदार रानभाजी महोत्सव
दरम्यान तालुक्यात नुकत्याच संपन्न झालेल्या रानभाजी महोत्सवात अनेकांना सहभागी होता आले नाही. त्यामुळे इच्छुकांनी व्यासपीठ देण्यासाठी आत्मा कमिटीने येत्या २७ ऑगस्टला दोडामार्ग मध्ये आगळ्या वेगळ्या रानभाजी महोत्सवाचे आयोजन केले आहे. रानभाजी महोत्सवात रान भाज्यांचे प्रदर्शन व त्या भाज्यांच्या वेगवेगळ्या डिशेश यांचे प्रदर्शन भरविले जाणार आहे. यात चांगलं प्रेझेन्टेशन देणाऱ्या शेतकऱ्यांतून तालुकास्तरावर प्रथम तीन क्रमांक काढले जाणार आहेत. यात अनुक्रमे ३, २, १ हजार अशी रोख बक्षिसे गोपाळ गवस, प्रेमानंद देसाई व बाबुराव धुरी यांनी जाहीर केली आहेत. त्यामुळे या रानभाजी महोत्सवात काढले जाणार तीन क्रमांक हे सुद्धा एक आकर्षण असणार आहे.