प्रतिनिधी / मडगाव
काल गुरुवारपासून आदर्श कृषी संस्थेने काजू बियांची खरेदी करण्यास सुरुवात केलेली आहे. काल पहिल्याच दिवशी 140 टन काजू बिया खरेदी करण्यात आल्याची माहिती संस्थे तर्फे देण्यात आली. त्यासाठी शेतकऱयांना प्रति किलो 105 रूपये दर देण्यात आला. मात्र, अनेक शेतकऱयांनी या दरावर नाराजी व्यक्त केली. गोवा बागायतदार संस्थेने हा दर निश्चित केला असून त्याच दराने आदर्शने काजू खरेदी करण्यावर भर दिला आहे.
कोरोना व्हायरसमुळे प्रति किलो 105 रुपये या दराने आम्हाला काजू बियां खरेदी कराव्या लागल्या. यातून शेतकऱयांचे व कारखानाचे नुकसान होता कामा नये यासाठी गोवा बागायदार संस्थेने प्रति किलो 105 रुपयाने काजू खरेदी करण्याचा जो निर्णय घेतला आहे. त्याच दराची अंमलबजावणी आदर्श कृषी संस्थेने सुद्धा केली आहे. आदर्श कृषी संस्था सेंद्रिय व सामान्य अशा दोन पद्धतीने काजू बियां खरेदी करीत असते. सेंद्रिय पद्धतीच्या काजू बियां मोठय़ा प्रमाणात खरेदी केल्या जातात. सेंद्रिय पद्धतीच्या काजू बियां मंगळूर येथे तर सामान्य काजूबियां तर्केवाडी येथे पाठविण्यात येतात अशी माहिती गोवा कृषी पणन मंडळचे व आदर्श कृषी संस्थेचे अध्यक्ष प्रकाश वेळीप यांनी ‘तरुण भारतच्या’ प्रतिनिधीकडे बोलताना दिली.
आदर्श कृषी संस्थेतर्फे बाळ्ळी, खोला, काणकोण, गावडोंगरी, खोतीगाव, मोरपिर्ला, बार्से, दाभाळ, धारबांदोडा, कुडचडे, केवण, फातोर्डा व सांगे अशा विविध ठिकाणी काजूबियांची खरेदी केली जाते. तसेच यंदा शेतकऱयाकडून काजू बियां खरेदी करण्यासाठी 45 दिवस बाकी राहिलेले आहे. तेव्हा या 45 दिवसात काजू बियां खरेदी केल्या जातील. रविवारी सुद्धा काजू घेण्याची तयारी संस्थेने ठेवली आहे. शेतकऱयांच्या गावात जाऊन सुद्धा काजू बियां खरेदी केल्या जातील. तेव्हा कुणीही चिंता करण्याची गरज नाही. तसेच केंद्र व राज्य सरकारच्या सामाजिक अंतरचे पालन करुन प्रत्येकाने एका रांगेत उभे राहून काजू बियांची विक्री करावी असे आवाहन अध्यक्ष वेळीप यांनी केले आहे.
आदर्श कृषी संस्थेकडे दहा हजार शेतकरी सदस्य आहेत. शेतकऱयांना यंदा काजूचे दर जास्त मिळावे यासाठी आमचे प्रयत्न होते. पण कोरोना व्हायरसमुळे आम्हाला प्रति किलो 105 रुपये अशा दराने खरेदी करावी लागत आहे. तेव्हा प्रत्येक शेतकऱयाने आम्हाला समजून घेण्याची गरज आहे. तसेच आमच्या केपे अर्बनच्या काही शाखा बंद असल्याने प्रत्येकाला पैसे देणेही कठीण होत आहे. जेव्हा ‘कोरोना’चे वातावरण बंद होईल, तेव्हा प्रत्येकाला पैसे देण्यात येईल. त्यामुळे शेतकऱयांनी घाबरण्याची गरज नाही.
आदर्श कृषी संस्था ही शेतकऱयांच्या सहकार्यासाठी आहे. ज्या प्रकारे गेल्या अनेक वर्षापासून शेतकऱयांनी आमच्यावर विश्वास ठेवलेला आहे अशाच प्रकारे यंदाही ठेवण्याची गरज आहे. आज कोरोना व्हायरसचे संकट असतानाही आमचे कर्मचारी शेतकऱयांना मदत करण्यासाठी कामावर रुजू झालेले आहेत. तेव्हा त्यांचेही अभिनंदन करण्याचे गरज आहे. आज शुक्रवारी सुद्धा आदर्श कृषी संस्थेतर्फे काजू खरेदी करण्यात येतील असे, वेळीप यांनी पुढे बोलताना सांगितले.
यावेळी यंदाच्या काजूच्या दरासंदर्भात विक्री करण्यात आलेल्या शेतकऱयांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी विचारपूस केली असता एक शेतकरी म्हणाला की, प्रति किलो 105 हा दर खुपच कमी असून सरकारने शेतकऱयांचा विचार करुन हा दर वाढविण्याची गरज आहे.
सुब्दळे येथील युवा शेतकरी सुभाष गावकर म्हणाले की, राज्यातील अनेक शेतकरी काजू बागायतीवर अवलंबून असतात. त्यामुळे सरकारने काजूचे दर चांगले ठेवावे यासाठी शेतकऱयांची मोठय़ा प्रमाणात सरकारकडे अपेक्षा असते. पण, दरवर्षी या शेतकऱयावर अन्याय होताना दिसतो. तसेच अनेक मुलांचे भविष्य यावरच अवलंबून असते. जर सरकारने शेतकऱयांना परवडणारा दर ठेवला तर शेतकऱयांच्या मुलांना उच्च शिक्षण घेण्यास मदतगार ठरते. जर हा दर वाढला नाही तर ग्रामीण भागातील अनेक मुलांना उच्च शिक्षण घेण्यासाठी खुपच कठीण होईल. काहींना घरीच बसावे लागेल. सरकार प्रत्येक युवकाने सरकारी नोकरीची अपेक्षा न ठेवता शेतीकडे वळण्याचे आवाहन करत असते. पण दिवस-रात्र कष्ट घेऊन काम करणाऱया शेतकऱयांना मदत करण्यास सरकारला अपयश येत असेल तर युवक शेतीकडे कसा वळेल, यावर सरकारने विचार करण्याची गरज आहे.
काजूचे उत्पन्न वाढावे यासाठी शेतकऱयाला खुपच कष्ट घ्यावे लागते. यासाठी कामगारांचीही मदत घ्यावी लागते. अर्धा पैसा कामगार वर्गावरच खर्च होत असतो. त्यामुळे शेतकऱयांना फायदा व्हावा अशा पद्धतीचा दर सरकारने ठेवण्याची गरज आहे.