सातारा : सामाजिक क्षेत्रांमध्ये तसेच देशाच्या व राज्याच्या प्रशानामध्ये उच्चपदावर काम करणारे जास्तीत जास्त अधिकारी हे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी आहेत. पुढील काळातही अशाच पद्धतीने विद्यार्थी घडावेत, त्यांना अधिकचे गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे म्हणून जिल्हा नियोजन समितीमधून मोठ्या निधीची तरतुद करण्यात आली आहे, असे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.
येथील स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात सन 2020-21 व 2021-22 या वर्षातील आदर्श प्राथमिक शिक्षक पुरस्काराचे वितरण आज पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी पाटील बोलत होते. ते म्हणाले, कोरोना संसर्गामुळे अनेक निर्बंध आहेत. या निर्बंधाच्या काळात विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्याचे चांगले काम शिक्षक करीत आहेत. जिल्हा परिषदेचा शिक्षणाचा दर्जा चांगला आहे, हा दर्जा वाढविण्यासाठी स्मार्ट टीव्ही, संगणक देण्यात आले आहेत. त्याचबरोबर स्मार्ट बोर्डसाठी 4 कोटींची तरतुद तसेच नवीन शाळांसाठी तरतुदही करण्यात आली आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत शिक्षकांनी चांगल्या पद्धतीने काम केले. ज्या शिक्षकांना पुरस्कार मिळाला आहे त्यांची जबाबदारी आता वाढली आहे. लवकर कोरोनाचे संकट दूर होईल आणि पुन्हा शाळा गजबजून जातील, अशी अपेक्षाही पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.
या प्रसंगी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदिप विधाते, शिक्षण व अर्थ समितीचे सभापती मानसिंगराव जगदाळे, कृषी सभापती मंगेश धुमाळ, समाज कल्याण सभापती कल्पना खाडे आदी उपस्थित होते.