विजय जाधव / गोडोली :
दुशेरे (ता. कराड) येथील डॉ. मृणाल शिवाजीराव जाधव या सध्या पुण्यातील सिंहगड इन्स्टिटय़ूटच्या सौ. वेणूताई चव्हाण पॉलिटेक्निकच्या प्राचार्या आहेत. अभियांत्रिकी पदवीनंतर नोकरी करत पुढे पीएचडी पदवी मिळवली. शिक्षणाची पंढरी समजल्या जाणाऱ्या पुण्यात शिक्षणाचा अतिउच्च दर्जा राखत आपल्या पॉलिटेक्निक इन्स्टिय़ूटचा सर्वदूर लौकिक वाढवण्यात त्यांना यशस्वी प्राचार्या म्हणून शिक्षण क्षेत्रात ओळखले जाते. त्या जिद्दी, प्रामाणिक, विद्यार्थीप्रिय, शिस्तप्रिय असून सातत्याने विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता आणि करिअरसाठी शक्य ते यशस्वी प्रयत्न करत असलेल्या आदर्श शिक्षिका डॉ. मृणाल जाधव या शिक्षण क्षेत्रातील जणु नवदुर्गा म्हणून ओळखल्या जातात.
अध्यापनाबरोबर संशोधन करत त्यांनी तब्बल 38 राष्ट्रीय, आंतराष्ट्रीय संशोधन पेपर सादर केले आहेत. पीएचडी प्रबंधासाठी ‘पाण्याचे व्यवस्थापन आणि दर्जा यामध्ये संगणकाच्या सहाय्याने गुणवत्तेचे पूर्वानुमान करणे, या विषयावर अभ्यास करताना त्यांनी गंगापूरच्या धरणातील पाण्याचा अभ्यास करून त्यांनी बनवलेले गुणवत्तेचे मॉडेल बहुचर्चित आहे. यावर आंतरराष्ट्रीय स्तरावर लेख प्रसिध्द झाला आहे. गावागावातील सांडपाणी थेट नदीच्या प्रवाहात सोडल्याने भविष्यात मोठी गंभीर परिस्थिती निर्माण होण्याअगोदर प्रत्येक गावाने जागृत होवून योग्य उपाय योजना करावी. दूषित पाण्याचे होणारे घातक दुष्परिणाम यावर त्यांचा गाढा अभ्यास आहे.
एकत्र कुटुंब पध्दतीच्या वातावरणातील बालपणी संस्कार आणि अंगी गुणवत्ता असलेल्या मृणालताईंच्या अभ्यासाची आवड पाहून आई वडिलांनी शिकण्यासाठी लहानपणापासून प्रोत्साहन दिले. मन, मेंदू, मनगटावर विश्वास बसला की कोणत्याही क्षेत्रात व्यक्ती निश्चित प्रगती करू शकते, हे त्यांनी सिध्द करून दाखवले आहे. जेव्हा अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रात महिलांचे प्रमाण कमी होते. त्याकाळात मृणालताईंने इस्लामपूरच्या राजाराम इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी या कॉलेजमधून बी.ई. स्थापत्य अभियांत्रिकी पदवी प्राप्त केली. कॉलेज जीवनात सांस्कृतिक महोत्सव, निवडणुकामध्ये हिरीरीने लक्षवेधी सहभागाने व्यक्तीमत्वाच्या कक्षा चांगल्याच रूंदावल्या. पदवीनंतर बी. जी. शिर्के यांच्या बहुराष्ट्रीय प्रकल्पावर कनिष्ठ अभियंता म्हणून काम करण्याची संधी त्यांना मिळाली.
कुटूंबातील जेष्ट मार्गदर्शक असणारे भारती विद्यापीठाचे जॉईंट सेक्रेटरी डॉ. के.डी. जाधव यांच्या प्रोत्साहनातून शिक्षण क्षेत्रात येण्याचा योगायोग घडला. पश्चिम महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रातील आघाडीची संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंहगड इन्स्टिटयूटच्या पुण्यातील सौ. वेणूताई चव्हाण पॉलिटेक्निकमध्ये व्याख्याता म्हणून डॉ. मृणाल जाधव यांना प्रथम संधी मिळाली. नोकरीत असताना उत्कृष्ट कामाची दखल घेऊन सिंहगड इन्स्टिटय़ूटचे संस्थापक, अध्यक्ष प्रा. एम. एन. नवले आणि सचिव डॉ. सुनंदा नवले यांनी स्थापत्य विभाग प्रमुख त्यांच्यावर जबाबदारी सोपवली. त्याचवेळी त्यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार ही मिळाला. पुढे महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाबरोबर काम करण्याची संधी मिळाली. मंडळाच्या विविध प्रकल्पात केलेल्या लक्षवेधी कामाने डॉ. मृणाल जाधव यांची शिक्षण क्षेत्रात सर्वदूर ओळख पोहचली. सौ. वेणूताई चव्हाण पॉलिटेक्निकमधील विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता आणि करिअरसाठी त्या घेत असलेल्या परिश्रमाची संस्थेने दखल घेत त्यांच्यावर याच इन्स्टिटयूटच्या प्राचार्यापदाची जबाबदारी सोपवली. त्या आजही समर्थपणे प्राचार्या पदाची जबाबदारी संभाळतात. या पॉलिटेक्निकची प्रयोगशाळा विकसित करण्यासाठी परिपूर्ण प्रपोजल करत एआयसीटीईकडून मोठा निधी ही मिळविण्यात त्या यशस्वी झाल्या आहेत. त्यांचे पाणी आणि पर्यावरण हे जिव्हाळयाचे विषय असून शक्य तिथे त्या यासाठी मार्गदर्शन, उपक्रम राबविण्यात त्या सक्रिय योगदान देतात.
पती डॉ. शिवाजी दिनकर जाधव यांच्या सोबत कुटूंबाची जबाबदारी संभाळत मुलगी आणि मुलाच्या करिअरकडे ही तितकेच लक्ष त्या देतात. मुलीने ही संगणक अभियांत्रिक पदवी पूर्ण केली असून ती पुण्यात नामांकित कंपनीत नोकरी करते.
डॉ. मृणाल जाधव म्हणतात की, “नेतृत्व कधीच अचानक फुलत नाही. त्याला जशी अनुभवीची जोड मिळत जाते. तशी कार्य कर्तृत्वाच्या कक्षा रूंदावत जातात. महिलांच्या अंगी मल्टिटास्किंगची क्षमता असते. जबाबदाऱया, कर्तव्य पार पाडत त्यांना आपले करिअर घडविताना. तसा संघर्ष करावा लागतो. मुलगी, पत्नी, आई, सासू, बहिण या भुमिका सांभाळून करिअर घडवावे लागते. माझ्या आयुष्यात भावाने मित्राप्रमाणे साथ दिली. आई वडिलांइतकेच सासू सासऱ्यांनी प्रोत्साहन दिले. पतीचे पाठबळ हीच जमेची बाजू असून नोकरीच्या ठिकाणी प्रत्येकाची साथ सुध्दा मोलाची ठरली आहे.