75 टक्के ई-केवायसी पूर्ण : उर्वरित लाभार्थ्यांसाठी काम सुरू
बेळगाव / प्रतिनिधी
अन्न व नागरी पुरवठा खात्याने रेशन वितरणात पारदर्शकता आणण्यासाठी ई- केवायसीचे (बायोमेट्रीक ठसे) काम हाती घेतले आहे. दरम्यान ई-केवायसीच्या मुदतीतदेखील सप्टेंबर अखेरपर्यंत वाढ केली आहे. दररोज दुपारी 12 ते 4 या वेळेत ई-केवायसीचे काम सुरू आहे. मात्र ई-केवायसीसाठी आधारकार्ड बंधनकारक असल्याने कामात अडचणी निर्माण होत आहेत.
विवाह, मृत्यू व स्थलांतरित झालेल्या लाभार्थ्यांच्या रेशनमधील गैरप्रकार रोखण्यासाठी ई-केवायसी आवश्यक आहे. याकरिता लाभार्थी ई-केवायसी करून घेत आहेत. मात्र अनेक लाभार्थ्यांच्या आधारकार्डमध्ये चुका असल्याने ई -केवायसीमध्ये व्यत्यय निर्माण होत आहे. ई-केवायसी करायची असल्यास पहिल्यांदा आधारकार्डमधील दुरुस्ती करून घ्यावी लागत आहे. या कामासाठी चार दिवस जात आहेत. त्यानंतरच लाभार्थ्यांना नवीन आधारकार्ड उपलब्ध होत आहे. त्यानंतर ई-केवायसी केली जात आहे. त्यामुळे ई-केवायसीचे काम लांबणीवर पडत आहे. आतापर्यंत 75 टक्क्मयांहून अधिक लाभार्थ्यांची ई-केवायसी झाली असली तरी उर्वरित लाभार्थ्यांसाठी काम सुरू आहे.
दरम्यान काही आधारकार्डवर मराठीत नावे आहेत तर काहींची नावे चुकीची आहेत. तर काहींच्या पत्त्यात बदल झालेला आहे. अशा लाभार्थ्यांना पहिल्यांदा आधारकार्डमधील दुरुस्ती करून घ्यावी लागत आहे. त्यानंतरच ई-केवायसीसाठी रेशनदुकानात जावे लागत आहे. आधारकार्डच्या सक्तीमुळेच ई-केवायसीचे काम लांबणीवर पडत आहे.