जागेच्या कब्जासाठी वक्फ बोर्डाच्या हालचाली, न्यायालयाची स्थगिती
प्रतिनिधी /बेळगाव
गेल्या अनेक वर्षांपासून आनंदवाडी येथे रहात असलेल्या नागरिकांची जमीन वक्फ बोर्डाने कब्जात घेण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. मात्र त्या विरोधात अनेकांनी न्यायालयात धाव घेतली आहे. मुख्य जिल्हासत्र न्यायालयाने त्याला स्थगिती दिली असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. या खटल्याबाबत पुढील सुनावणी 13 डिसेंबर रोजी होणार आहे.
आनंदवाडीतील जागा ही वक्फ बोर्डाच्या मालकीची असल्याचे सांगत ती जागा कब्जात घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. काही दिवसांपूर्वी जमीन कब्जात घेण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. त्याला आनंदवाडीवासियांनी संयुक्तपणे तीव्र विरोध केला. त्यामुळे कब्जा घेण्यासाठी कोणीच फिरकले नाही. मात्र त्यानंतर आता दुंडाप्पा गुंडू ढवळे (रा. येळ्ळूर रोड, संभाजीनगर) यांच्यासह काही जणांनी वक्फ बोर्डाविरोधात न्यायालयात धाव घेतली आहे.
न्यायालयाने अर्जदारांची बाजू ऐकून घेऊन स्थगिती दिली आहे. रस्त्यावरील लढाईबरोबरच न्यायालयीन लढाईला यश मिळाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. ऍड. एस. के. शहाबादी यांनी या अर्जदारांची बाजू मांडली आहे. नागरिकांनी याप्रकरणी न्यायालयात धाव घेतल्याने काही जणांना दिलासा मिळाला आहे.
कायद्याचा आधार घेणेच योग्य
आनंदवाडीवासियांचा खटला गेल्या अनेक वर्षांपासून न्यायालयात प्रलंबित होता. त्याबाबत न्यायालयाने अनेकांना नोटिसा बजावल्या होत्या. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. न्यायालयाची नोटीस किंवा समन्स आले तर तातडीने ते स्वीकारुन न्यायालयात धाव घेणे गरजेचे होते. मात्र अनेक जण न्यायालयाकडे फिरकले नाहीत. त्यामुळेच त्रास सहन करावा लागला आहे. तेक्हा न्यायालयात जाऊन या खटल्याच्या पाठपुराव्यासाठी प्रत्येकानेच काम करणे गरजेचे असल्याचे मत नारायण सावंत यांनी व्यक्त केले आहे.