माझ्या जीवीची आवडी । पंढरपुरा नेईन गुढी ।। असा भाव मनात बाळगत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेने निघाल्या आहेत. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीने आळंदीहून प्रस्थान ठेवले असून, पुणे, सासवडमार्गे ही पालखी सोमवारी वाल्हे मुक्कामी पोहोचणार आहे. तर तुकोबारायांची पालखी लोणीकाळभोरमार्ग उडंवडी गवळय़ाचीमध्ये मुक्कामाकरिता असेल. त्याचबरोबर अन्य संतांच्या पालख्याही चंद्रभागेच्या दिशेने निघाल्या असून, आनंदवारीने पंढरीची वाट आता तेजाळून गेली आहे. वारी आणि वारकरी यांच्यात एकप्रकारचे अद्वैत आहे. या दोहोंना वेगळे करताच येत नाही. वारकरी वारीचा नेम कधी चुकवत नाहीत. कोरोना संकट काळाचाच काय तो अपवाद. वैश्विक महामारीमुळे मागची दोन वर्षे पायी वारी सोहळा होऊ शकला नाही. परंतु, निर्बंध उठविण्यात आल्यानंतर पुन्हा हा सुखसोहळा सुरू होणे, हे आनंददायीच म्हणायला हवे. ना कोणता सांगावा, ना कोणता निरोप. फक्त विठुरायाच्या आत्मिक लळय़ापोटीच दरवर्षी लाखो वारकरी पालखी सोहळय़ात एकवटत असतात. दोन वर्षांच्या खंडामुळे या वर्षी विक्रमी गर्दी होईल, अशी अपेक्षा होती. तथापि, पावसाअभावी शेती व पेरण्यांची कामे पार पडू न शकल्याने वारकऱयांच्या संख्येवर तुलनेत परिणाम झाल्याचे जाणवते. असे असले, तरी पावसाची व शेतीची कामे उरकल्यानंतर टप्प्यागणिक त्यात वाढू होऊ शकेल. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म । भेदाभेद भ्रम । अमंगळ ।। हे भागवत धर्माचे सार आहे. उच्च-नीच, लहान-मोठा असा कोणताही भेदभाव या संप्रदायात नाही. टाळ-मृदंगाचा गजर आणि ज्ञानोबा-तुकोबा नामाचा जयघोष हे वैष्णवांचे ऊर्जा केंद आहे. ऊन, वारा, पाऊस, थंडी यापैकी कशाचीही तमा न बाळगता केवळ विठ्ठलनामाच्या बळावर वारकरी ही वाट तुडवत असतात. सुख पाहता जवापाडे । दुःख पर्वताएवढे ।। असे तुकोबांनी म्हटले आहे. कोरोनात हा कठीण काळही सर्वांनी अनुभवला. वेगवेगळय़ा दुःखद प्रसंगांतून, ताणतणावातून अनेक कुटुंबांना जावे लागले. तथापि, माणसे तगून राहिली. तेथेही मन करा रे प्रसन्न । सर्व सिद्धीचे कारण ।। या संतवंचनाने अनेकांना तारले. महाराष्ट्राची संतपरंपरा देदीप्यमान अशी आहे. ज्ञानोबा, तुकोबा, निवृत्तीनाथ, नामदेव, एकनाथ, सावता, गोरोबा, चोखा, रोहिदास, मुक्ताबाई, जनाबाई अशा कितीतरी संतांच्या आचारविचारांतून महाराष्ट्राची सर्वसमावेशक संस्कृती आकारबद्ध झाली आहे. आज पुन्हा याच संतविचारांची कास धरल्याशिवाय आपल्याकडे पर्याय उरलेला नाही. दिवसेंदिवस मूल्यांचा ऱहास होत आहे. माणसांमधील माणूसपण, माणुसकी हरवत चालली आहे. कोम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सरादी षड्रिपूंच्या आहारी माणसे जात आहेत. त्यातून नैतिक अधःपतन होऊ लागले आहे. अशा काळात केवळ आणि केवळ संत विचारच आपल्याला तारू शकेल. ‘कोणाही जीवाचा न घडो मत्सर,’ असे संतांनीच सांगून ठेवले आहे. संत विचारांचा असा वारसा लाभलेल्या महाराष्ट्रात मात्र मागच्या काही दिवसांत जो खेळ सुरू आहे, तो वेदनादायीच म्हणायला हवा. आज राज्यापुढे, देशापुढे अनेक प्रश्न आहेत. महागाई, बेरोजगारीसह अनेक भागांत पाण्याचा प्रश्न बिकट आहे. जून सरत आला, तरी अद्याप बहुतांश ठिकाणी पावसाचे आगमन झालेले नाही. त्यामुळे बळीराजा चिंताक्रांत झाला आहे. अर्थात त्याची कुणाला फिकीर असण्याचे कारण नाही. खरे पाहता अशा टप्प्यावर लोकप्रतिनिधींनी विविध पातळय़ांवर जनमानसाच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी पुढे यायला हवे. मात्र, तेच लोकप्रतिनिधी पलायनवादी भूमिका स्वीकारत असतील, तर त्यास काय म्हणावे? एका पक्षाचे काही आमदार फुटतात, परत स्वतःमधील कुणी फुटू नये, याकरिता इतर राज्यांमध्ये भटकंती करत बसतात, ही वास्तविक शोकांतिकाच म्हटले पाहिजे. जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले, हा तुकोबांचा अभंग प्रसिद्ध आहे. देहू येथील संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिर लोकार्पण सोहळय़ात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा अभंग उद्धृत केला होता. आज किती लोकप्रतिनिधी या अभंगाप्रमाणे आचरण करतात, जनसेवा हीच ईश्वरसेवा मानून त्याप्रमाणे वर्तणूक करतात, हा प्रश्न आहे. फोडाफोडी, कट कारस्थाने, घोडेबाजार, या गोष्टी महाराष्ट्रात पूर्वीही झाल्याच आहेत. किंबहुना, या खेपेला जो त्याचा कळस गाठला गेला, तो किळसवाणा होय. माध्यमांनीही याविषयीचे वार्तांकन करताना अशा गोष्टींना किती झुकते माप द्यायचे याचा विचार केला पाहिजे. 24 तास वृत्तवाहिन्या, संकेतस्थळांवर अशा राजकीय बातम्यांचा रतीब घातला जातो. मात्र, वारीच्या सोहळय़ाची बातमी दाखविण्यास अवसर मिळत नाही, ही आजच्या माध्यमजगताची करुण अवस्था आहे. मुद्रित माध्यमांमध्ये याबाबतच्या बातम्या प्रसिद्ध होत असल्या, तरी तेथेही काहीसे दुय्यम स्थान मिळाल्याचे दिसून येते. हे काही चांगले लक्षण नाही. त्यामुळे लाखो लोकांनी सजलेल्या पालखी सोहळय़ालाही कसे स्थान देता येईल, याकरिता माध्यमांनी गंभीर असायला हवे. दरवर्षी आषाढीला पंढरपुरात विठ्ठल-रखुमाई मंदिरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय पूजा होत असते. या खेपेला ती कुणाच्या हस्ते होणार, असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे. ती कुणाच्या हस्ते होणार, हा भाग अलाहिदा. परंतु, राज्यात निर्माण झालेले कलुषित वातावरण आधी स्वच्छ व्हायला हवे. येत्या 9 जुलैला संतांच्या पालख्या वाखरी येथे पोहोचतील. तेथे वैष्णवांच्या या मेळय़ाला महामेळय़ाचे स्वरुप प्राप्त होईल. त्यानंतर 10 जुलैला आषाढी एकादशीदिनी पंढरपुरात भक्तीचा महापूर दिसेल. भक्तीचा हा सोहळाच खऱया अर्थाने तुम्हा आम्हा सर्वांना जगण्याचा मार्ग दाखविणार आहे. पुढच्या काही दिवसांत राज्यासह सर्वत्र देशभर चांगला पाऊस व्हावा, शेती उत्तम व्हावी, सगळे गुण्यागोविंदाने नांदावेत, महाराष्ट्रासह अवघा देश सुजलाम् सुफलाम् व्हावा आणि सर्व लोकप्रतिनिधींमध्ये लोकहिताची चाड निर्माण व्हावी, त्यांना सद्बुद्धी मिळावी, अशीच श्री विठ्ठलाचरणी आपण प्रार्थना करुयात.
Previous Articleधक्कादायक : मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात तीन वर्षीय बालक ठार
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.