कार्लुस आल्मेदा यांच्याकडून मंत्री नाईक यांच्यावर पालिका इमारतीच्या कामात घोटाळय़ाचा आरोप, मंत्र्यांनी आरोप फेटाळले
प्रतिनिधी /वास्को
वास्कोचे आमदार कार्लुस आल्मेदा आणि नगरविकासमंत्री मिलिंद नाईक यांच्यात पुन्हा पेटले आहे. मुरगाव पालिका इमारतीच्या नुतनीकरणाच्या कामात त्यांच्या जीसुडा अंतर्गंत मंत्री मिलिंद नाईक यांनी घोटाळ केल्याचा आरोप आमदार कार्लुस आल्मेदा यांनी केला आहे. मंत्री मिलिंद नाईक यांनी या संशस्यापद प्रकाराबाबत खुलासा करावा अशी मागणी आमदार आल्मेद यांनी केली आहे. तर मंत्री मिलिंद नाईक यांनी आपण खरोखरच घोटाळा केल्याचा संशय आमदार कार्लुस आल्मेद यांना असल्यास त्यांनी आपल्याविरूध्द मुख्यमंत्र्यांकडे किंवा भारतीय जनता पार्टीकडे तक्रार करावी व आरोपही सिध्द करावेत असे आव्हान दिले आहे.
वास्को आणि मुरगाव मतदारासंघाच्या आमदारांमध्ये मागच्या पाच वर्षांच्या काळात कधीही पटलेले नाही. मागच्या विधानसभा निवडणुकांपासूनच मंत्री मिलिंद नाईक आणि आमदार कार्लुस आल्मेदा यांच्यामध्ये बेबनाव निर्माण झाला होता. त्यानंतर पालिका राजकारणामुळेही त्यांच्यात बरेच बिनसले होते. अधुनमधुन त्यांच्यातील वाद उफाळून येत असतो. परंतु मागच्या पालिका निवडणुकांपासून त्यांच्यामधील शितयुध्द थांबले होते. आता विधानसभा निवडणुका जवळ येऊन ठेपताच एकाच पक्षातील व सरकारमधील या दोन नेत्यांमध्ये पुन्हा वाद धुमसू लागलेला आहे. त्यांच्यामधील वाद ऐन निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा चहाटय़ावर येण्याचे कारण विधानसभा निवडणुक हेच असल्याची चर्चा सुरू आहे. हा वाद येत्या दोन महिन्यांत अधिकच वाढण्याची शक्यता आहे. आमदार कार्लुस आल्मेदा यांनी सोमवारी सकाळी मंत्री मिलिंद नाईक यांच्यावर शहराच्या ठिकाणी मध्यभागी उभे राहून उघडपणे आरोप करून त्यांनी आपलेच मंत्री मिलिंद नाईक यांच्याविरूध्दची पोटतिडक दाखवून दिली आहे. त्यासाठी मुरगाव पालिका इमारतीचे नुतनीकरण निमित्त ठरलेले आहे.
वारसा इमारतीचे त्याच पद्धतीने संवर्धन व्हायला हवे
मुरगावची पालिका इमारत ही पोर्तुगीजकालीन असून तीला जवळपास शंभर वर्षे होत आली आहेत. या इमारतीच्या नुतनीकरणाचे काम साधारण वर्षभरापूर्वी हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी आठ कोटी रूपये खर्च करण्यात येत असून नगरविकासमंत्री मिलिंद नाईक यांच्या अध्यक्षतेखालील जुसुडामार्फत हे काम करण्यात येत आहे. मात्र, पालिका इमारतीचे काम योग्य पध्दतीने होत नसल्याचा व या कामात घोटाळा झालेला असल्याचा आरोप आमदार कार्लुस आल्मेदा यांना केला आहे. मुरगावची पालिका इमारत ही वारसा इमारत असून ती आहे त्याच पध्दतीने ठेवण्याची व तीचे आहे त्याच पध्दतीने सवर्धन करण्याची गरज आहे. मात्र, जीसुडामार्फत केले जाणारे या इमारतीचे काम हवे त्या पध्दतीने होत नाही. या इमारतीवर लाकडी छत होते. त्यावर नळे होते. परंतु ते लाकडी छत व नळे हटवून त्यावर लोखंडी कमानी वापरून पत्र्यांचे छत उभारण्यात आले आहे. अशा प्रकाराने वारसा इमारतीचे स्वरूप बदलता येणार नाही. इमारतीच्या छताचे लाकूड व नळे कुठे गेले हेसुध्दा कुणाला माहित नाही. जीसुडा हाती घेतलेल्या या कामात मोठा घोटाळा झालेला असून या घोटाळय़ाची तज्ञांकडूनच चौकशी व्हायला हवी असे आमदार कार्लुस आल्मेद यांनी म्हटले आहे. यात मुरगाव पालिका, मुख्याधिकारी गुंतलेले नसून या घोटाळय़ात मंत्री मिलिंद नाईक यांची जीसुडाच गुंतलेली आहे. त्यांनी या घोटाळय़ाचा खुलासा करायला हवा अशी मागणी आमदार आल्मेदा यांनी केली.
मासे विक्रेत्यांविरूध्द आता कडक कारवाई कारावी लागेल
दरम्यान, वास्कोतील मासळी विक्रेत्या जुने मार्केट सोडायला तयार नसल्याने आमदार कार्लुस आल्मेदा यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मासळी मार्केटच्या जुन्या आराखडय़ाला मासे विक्रेत्यांनी विरोध केल्याने त्यांच्या मागणीनुसार नवीन आराखडा तयार करण्यात आला. आता जुन्या मासळी मार्केटच्या जागी नवीन मार्केट उभारायचे असल्याने मुरगाव पालिकेने शहरातील शासकीय जमीन भाडय़ाने घेऊन पाच लाख रूपये भाडेही भरलेले आहे. त्या ठिकाणी तात्पुरते मार्केटही उभारण्यात आलेले आहे. मासळी विक्रेत्यांच्या मागणीनुसार शहरात घाऊक मासे विक्री करणाऱया मासे विक्रेत्यांविरूध्द मुख्याधिकाऱयांनी कारवाईसुध्दा हाती घेतलेली आहे. त्यांच्या सर्व तक्रारी सोडवण्यात आलेल्या आहेत. तरीही मासे विक्रेत्या मार्केट सोडायला तयार नसल्यास त्यांच्याविरूध्द कडक कारवाई हाती घ्यावी लागेल असे आमदार कार्लुस आल्मेदा यांनी स्पष्ट केले आहे. मासे विक्रेत्या लोकांची फसवणुक करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.
आमदारांनी थेट मुख्यमंत्री किंवा भाजपाकडे आपल्याविरूध्द तक्रार करावी- मिलिंद नाईक
दरम्यान, आमदार कार्लुस आल्मेदा यांनी मुरगाव पालिका इमारतीच्या कामासंबंधी केलेले आरोप फेटाळले आहेत. आपल्याविरूध्द आमदारांनी जे आरोप केले आहेत, त्यासंबंधी ते आपल्याशी बोलले असते तर बरे झाले असते. आम्ही एकाच पक्षाचे आहोत. परंतु त्याना आपल्याशी बोलायचे नसल्यास त्यांनी आता आपल्याविरूध्द थेट मुख्यमंत्री किंवा भाजपाकडे तक्रार करावी व आपल्यावरील आरोप सिध्द करावे असे म्हटले आहे. पालिका इमारतीचे नुतनीकरण हे पालिकेला विश्वासात घेऊनच करण्यात येत असून त्यांच्यामागणीनुसारच ते करण्यात येत आहे. जीसुडातर्फे आतापर्यंत गोव्यात अनेक ठिकाणी कामे करण्यात आलेली असून आतापर्यंत कुठेही तक्रार आलेली नाही. घोटाळा करण्याची ईच्छा झाल्याससुध्दा आपण किमान वास्को तरी घोटाळा करणार नाही. कदाचीत आमदार कार्लुस आल्मेदा यांना आपली बदनामी करण्यास समाधान लाभत असावे असे मंत्री मिलिंद नाईक यांनी म्हटले आहे.