आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱयांचे निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
कोरोना काळात आम्ही रुग्णांवर उपचार केले आहेत. जीव धोक्यात घालून आम्ही सेवा बजावली आहे. असे असताना आता आम्हाला कामावरून कमी करण्यात येत आहे. त्यामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. तेव्हा आम्हाला कायमस्वरुपी कामावर रुजू करून घ्यावे, अशी मागणी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये काम केलेल्या परिचारिका व इतर कर्मचाऱयांनी जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कठीण परिस्थितीत आम्ही काम केले असताना आता मात्र आम्हाला कामावरून कमी करण्यात येत आहे. वास्तविक आम्ही ज्यावेळी काही डॉक्टर तसेच कर्मचारी काम करण्यास तयार नव्हते त्यावेळी आम्ही काम केले आहे. त्याची जाणिव ठेवावी आणि आम्हाला कामावर घ्यावे, असे निवेदनात म्हटले आहे. यावरून कित्तूर चन्नम्मा चौक येथे आंदोलन छेडण्यात आले.
गेल्या सहा महिन्यांपासून आम्ही निवेदने देत आहोत. मात्र, जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभाग त्याकडे दुर्लक्ष करत आहे. सहानुभूतीपूर्वक आमच्याकडे पाहावे व आम्हाला काम द्यावे, अशी मागणीही करण्यात आली. यावेळी आरोग्य विभागातील कंत्राटी पद्धतीवर काम करणारे कर्मचारी उपस्थित होते.