प्रतिनिधी/ बेळगाव
आम्हाला कोरोनाबाबत सर्वेक्षण करण्यास पाठविण्यात येत आहे. मात्र आम्हालाच मारहाण करण्यात येत असल्यामुळे आम्ही सर्वेक्षण कसे करायचे, असा सवाल करत आशा कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून आम्हाला संरक्षण द्या, अशी मागणी केली आहे.
गणेशपूर येथे सर्वेक्षणासाठी गेले असता आशा व अंगणवाडी कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आली. त्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून आम्ही उन्हामध्ये फिरून सर्वेक्षण करत आहे. आम्ही जनतेसाठी हे काम करत असताना आमच्यावरच हल्ला झाला. ही बाब गंभीर आहे. तेंव्हा हल्ला करणाऱयांवर कठोर कारवाई करावी, याचबरोबर आम्हाला संरक्षण द्यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
आता प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन त्यांची माहिती जमा करण्याची जबाबदारी आशा व अंगणवाडी कार्यकर्त्यांवर सोपविण्यात आली आहे. हे काम करत असताना काही ठिकाणी दगडफेक होत आहे तर काही ठिकाणी मारहाण होत आहे, असे होत राहिले तर आम्ही काम कसे करू, असा सवालदेखील करण्यात आला.
शिरस्तेदार मंजुनाथ जानकी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी मंदा नेवगी, ऍड. नागेश सातेरी, जी. व्ही. कुलकर्णी यांच्यासह आशा कार्यकर्त्या उपस्थित होत्या.