क्रीडा प्रतिनिधी/ मडगाव
सातव्या हिरो इंडियन सुपरलीग फुटबॉल स्पर्धेत केरळ ब्लास्टर्सचा सामना चेन्नईन एफसीशी होणार आहे. दोन्ही संघांच्या बाद फेरीच्या आशा संपुष्टात आल्या असल्या तरी मोसमाची सांगता विजयाने करण्यासाठी तसेच प्रतिष्ठतेसाठी ही लढत महत्वाची असेल. बांबोळीतील जीएमसी स्टेडियमवर हा सामना खेळविण्यात येईल.
केरळ ब्लास्टर्सला गेल्या सहा सामन्यांत विजय मिळालेला नाही. अनेक वेळा बचावफळीने त्यांची निराशा केली आहे. या टप्प्यात त्यांना 12 गोल पत्करावे लागले आहेत. या लढतीसाठी हंगामी प्रशिक्षक इश्फाक अहमद यांच्याकडे सुत्रे असतील. आता आम्ही ज्या स्थितीत आहोत ती खडतर आहे. खूप गोष्टी बदलण्यासाठी फारसा वेळ नाही, पण काही बाबतील सुधारणा करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. सर्वांत महत्वाची गोष्ट म्हणजे खेळाडू प्रेरीत आहेत, असे इश्फाक अहमद म्हणाले.
दुसरीकडे चेननईनसाठी दैव तेवढे अनुकूल ठरलेले नाही. बाद फेरी गाठण्याची त्यांना हरप्रकारे संधी होती, पण क्साबा लॅसझ्लो यांचा संघ गेले आठ सामन्यांत एकही विजय मिळवू शकला नाही. त्यातच मागील दोन सामन्यांत एफसी गोवा आणि नॉर्थईस्ट युनायटेड एफसी यांच्याविरूद्ध भरपाई वेळेतील गोलमुळे त्यांना बरोबरीवर समाधान मानावे लागले. हे दोन्ही निकाल त्यांच्यासाठी धक्कादायक होते.
मला संघाचा अजुनही अनेक कारणांसाठी अभिमान वाटतो,असे लॅस्झलो म्हणाले. कोणताही संघ समोर असला तरी त्यांनी निर्धाराने खेळ केला. खरोखरच माझ्या संघाने झंजार दृष्टिकोन प्रदर्शित केला, पण एफसी गोवा आणि नॉर्थईस्ट युनायटेड यांच्याविरूद्ध आमचे दोन-दोन गुण हुकले, असे लॅस्झलो म्हणाले.
केरळ ब्लास्टर्सविरूद्ध विजय मिळाल्यास चेन्नईसाठीचे चित्र बदलणार नाही, कारण संघासाठी आणि चाहत्यांसाठी लॅसझ्लो यांना विजय हवा आहे. आम्हाला सामना जिंकायचा आहे हे चाहते, क्लबचे मालक आणि इतर प्रत्येकास आम्हाला दाखवून दय़ायचे आहे. जमशेदपूर एफसीविरूद्ध आम्हाला पहिला सामना जिंकला होता आणि आमच्या अखेरच्या सामन्यात केरळ ब्लास्टर्स जिंकण्याचा आमचा प्रयत्न असेल, असे लॅसझ्लो म्हणाले.