नवी दिल्ली / वृत्तसंस्था
मागील 10 वर्षात आयसीसीने क्रिकेट अतिशय यशस्वीपणे संपवले आहे, अशी खरमरीत टीका पाकिस्तानचा माजी जलद गोलंदाज शोएब अख्तरने केली. ईएसपीएनक्रिकइन्फोच्या पॉडकास्टमध्ये संजय मांजरेकर यांच्याशी तो बोलत होता. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील सर्व नियम व एकंदरीत स्थिती फक्त फलंदाजांनाच पोषक आहे, याचा त्याने येथे उल्लेख केला. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये जलद गोलंदाजांचा ट्रेंड सध्या कमी झाला आहे, यावर मांजरेकरने त्याचे मत विचारले. त्या प्रश्नाला अनुसरुन अख्तरने सदर वक्तव्य केले.
सध्याच्या घडीला दोन नवे चेंडू वापरले जातात आणि सर्कलबाहेर चारच क्षेत्ररक्षक तैनात असतात. त्यामुळे षटकातील बाऊन्सर्सची संख्या देखील वाढवायला हवी, असे शोएब अख्तरचे मत आहे. सध्याच्या नियमानुसार, दोन नवे चेंडू असताना षटकात एकच बाऊन्सर टाकण्याची परवानगी आहे, याकडे अख्तरने येथे लक्ष वेधले.
‘मागील दहा वर्षांच्या कालावधीत क्रिकेटचा दर्जा वृद्धिंगत झाला आहे की रसातळाला पोहोचला आहे, असा प्रश्न विचारला तर आपल्यासमोर खरे चित्र उभे राहील. मी खेळत असताना सचिनशी माझी जुगलबंदी रंगायची. अशा किती जुगलबंदी सध्याच्या क्रिकेटमध्ये होतात’, असा प्रश्न त्याने उपस्थित केला. माझ्यासारखे लोक पाकिस्तान क्रिकेट मंडळात असतील तरच जलद गोलंदाजांची नवी पिढी घडवणे शक्य आहे. तंत्र, अभ्यास, आहार, बोलण्याचालण्याची लकब अशा विविध स्तरावर अव्वल असे 12 जलद गोलंदाज मी आतापर्यंत निश्चितच घडवले असते’, असे शोएब अख्तर शेवटी म्हणाला.