वृत्तसंस्था / कोलकाता
भारतात होत असलेल्या हिरो पुरस्कृत आय लीग फुटबॉल स्पर्धेचे भवितव्य अधांतरी असल्याचे स्पर्धा आयोजकांनी सांगितले. देशातील कोरोना व्हायरसच्या परिस्थितीवरच या स्पर्धेचे भवितव्य अवलंबून राहील. संपूर्ण देशामध्ये 21 दिवसांसाठी लॉकडाऊनचा निर्णय पंतप्रधानांनी यापूर्वी घेतला आहे. याचा कालावधी पूर्ण झाल्यानंतरच आय लीग फुटबॉल स्पर्धा संदर्भात निश्चित निर्णय घेतला जाईल, असे भारतीय फुटबॉल फेडरेशनच्या प्रवक्त्याने सांगितले.
कोरोना व्हायरसच्या संकटामुळे आय लीग फुटबॉल स्पर्धा 14 मार्च रोजी तहकूब करण्याचा निर्णय घेण्यात आला होता त्यावेळी सदर स्पर्धेतील चार फेऱया शिल्लक होत्या. आता ही स्पर्धा पुन्हा खेळविली जाईल याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. स्पर्धेच्या गुणतक्त्यात आघाडीवर असलेल्या मोहन बागान संघाला या स्पर्धेतील विजेता म्हणून यापूर्वीच घोषित केले आहे. या स्पर्धे संदर्भात अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनने 15 एप्रिलनंतर अधिकृत बैठक बोलविली आहे. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेतील 28 सामने बाकी राहिले आहेत. गुणतक्त्यात मोहन बागानने पहिले स्थान, मिनर्व्हा पंजाब, इस्ट बंगाल यांनी 16 सामन्यांतून प्रत्येकी 23 गुण आणि रियल काश्मीरने 15 सामन्यांतून 22 गुण घेतले आहेत.