प्रतिनिधी / इस्लामपूर
येथील राजारामबापू इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी या अभियांत्रिकी महाविद्यालयाची अखिल भारतीय तंत्रज्ञान शिक्षण परिषदेच्या वतीने “एआयसीटीई-आयडिया लॅब” ही प्रयोगशाळा स्थापन करण्यासाठी निवड झाली असल्याची माहिती संचालक डॉ. सुषमा कुलकर्णी यांनी दिली.
या प्रयोग शाळेमध्ये विद्यार्थ्यांना नवसंकल्पना विकास, मूल्यमापन आणि त्याचा प्रत्यक्ष वापर यासाठी आवश्यक तंत्रज्ञान आणि साधन सामुग्री उपलब्ध करून दिली जाणार आहे.
विद्यार्थ्यांना विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणिताच्या मूलभूत तत्वांच्या अनुभवासाठी आणि त्यांच्यामध्ये उत्पादक दृष्टी निर्माण करण्यासाठी या अभिनव प्रयोगशाळेची स्थापना केली जाणार आहे. संपूर्ण भारतातून २५० अर्जापैकी ४९ संस्थांची निवड झाली असून आरआयटी ही संस्था महाराष्ट्रातून निवडलेल्या ५ संस्थापैकी एक आहे. प्रस्तावित प्रयोगशाळा ही विद्यार्थ्यांना नावीन्यपूर्ण प्रकल्प तयार करण्यासाठी सातही दिवस २४ तास खुली राहणार आहे. सीएनसी मशीन, ३डी प्रिंटर स्कॅनर आणि इतर अनेक यंत्रसामग्री असलेल्या या लॅब मध्ये विध्यार्थी त्यांच्या कल्पनांना प्रॉडक्ट प्रोटोटाइप मध्ये रूपांतरित करण्याचा प्रयत्न करणार आहेत.