सात वर्षांनंतर बदलला नियम – पुढील वर्षापासून एटीएममधून पैसे काढणे महागणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
बँकेच्या ग्राहकांनी यापुढे एटीएमचे व्यवहार करायचे असतील तर जरा आता विचार करावा लागेल. कारण भारतीय रिझर्व्ह बँकेकडून एटीएम संदर्भातील नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे. यामध्ये आरबीआयने बँकांच्या आर्थिक-बिगर आर्थिक एटीएम व्यवहारांवरील शुल्कामध्ये वाढ करण्यास मंजुरी दिली असल्याची माहिती दिली आहे.
मोफत एटीएमसंबंधीत व्यवहार संपल्यानंतर पुन्हा रोख रक्कम काढतेवेळी शुल्क आकारणी करण्यात येणार आहे. सध्या बँका अशा व्यवहारांवर बँक ग्राहकांना 20 रुपयाचे प्रति व्यवहार शुल्क आकारते.
आरबीआयने इंटरचेंज शुल्क अधिक असल्याच्या कारणामुळे खर्चाची भरपाई करण्यासाठी बँक ग्राहकांकडून मोफत व्यवहारानंतर करण्यात येणाऱया व्यवहारांवर शुल्क वाढ करणार आहे. ही वाढ साधारणपणे 21 रुपये केली जाणार आहे. हा नियम 1 जानेवारी 2022 मध्ये लागू करण्यात येणार असल्याचे संकेत आहेत. एटीएममधून रोख काढण्यावर जवळपास मागील सात वर्षांच्या कालावधीनंतर शुल्क वाढ करण्यात आली आहे.
इंटरचेंज शुल्क 15 ते 17 रुपये
एटीएम व्यवहाराशी संबंधीत इंटरचेंज शुल्क वाढविण्यास रिझर्व्ह बँकेने मंजुरी दिली आहे. यामुळे आता सर्व बँका आपल्या एटीएम व्यवहारावरील इंटरचेंज शुल्क वाढवणार असल्याचे संकेत आहेत. या बदलानंतर बँक बिगर आर्थिक व्यवहारांवर शुल्क 5 ते 6 रुपये आणि आर्थिक व्यवहारांवर शुल्क 15 ते 17 रुपयांपर्यंत आकारणार असल्याची माहिती आहे. इंटरचेंज व्यवहाराशी संबंधीत असणारे नियम हे 9 वर्षांनंतर बदलण्यात आले आहेत. हा नवा नियम 1 ऑगस्ट 2021 पासून अंमलात येणार आहे.
देशातील एटीएमची संख्या
31 मार्च 2021 पर्यंत देशामध्ये ऑनसाइट एटीएमची संख्या 1,15,605 होती. तर ऑफ साइट एटीएम संख्या ही 97,970 होती. 31 मार्च 2021 पर्यंत देशातील सर्व बँकांकडे जवळपास 90 कोटी एटीएम कार्ड चलनामध्ये होते. एचडीएफसी बँकेने 1987 मध्ये मुंबईत पहिले एटीएम सुरु केले होते.