कोरोनाशी लढा देतच गोमंतकीय झाले सज्ज
प्रतिनिधी / पणजी
श्रावणमासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे… श्रावण मास जवळ आल्यावर लहानपणी शाळेत शिकलेल्या या कवितेच्या ओळी आजही सर्वांना आठवतात. राज्यात उद्या मंगळवार 21 जुलैपासून श्रावण मासाला सुरुवात होत आहे. सर्वत्र हिरवळ पसरलेली आहे. हिरवेगार डोंगर, हिरवी माळराने आणि त्यावर उगवलेली हिरवीकंच झाडेझुडपे मन लुभावीत आहेत. नदी-नाले भरून वाहत आहेत. अशा वातावरणात कोरोना महामारीच्या विरोधात लढा देतच समस्त गोवेकर श्रावण मासाची आपली शतकानुशतकांची प्राचीन दिव्य पंरपरा पुढे नेण्यासाठी… धार्मिक विधी, सण, उत्सवांसाठी सज्ज झाले आहेत.
गोव्यात श्रावण मासाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. माणसातली धार्मिकता, पुजापाठ आणि सणउत्सवी विचार या काळात अधिक चैतन्याने बहरुन येतात. वर्षभर सुरु असलेल्या गावोगावाच्या मंदिरातील धार्मिक विधी व विविध कार्यक्रमांना या श्रावणमासात उधाण येते. श्रावणात मंदिरांना एक वेगळेच रुप प्राप्त होते. माणसांची गर्दी वाढते. अभिषेक व अन्य धार्मिक विधी केले जातात. माणसातील सात्विकता व धार्मिकता या काळात अधिक उज्ज्वल बनते.
गोव्यातील श्रावणमासाचे वैशिष्टय़
श्रावणमासात फुलांना मागणी वाढते. फुलांच्या परडय़ा भरून मंदिराची वाट चालतात. भाविकतेला या काळात उधाण येते. नामस्मरण व ईश्वरसेवाही या काळात ओसंडून वाहू लागते. माणूस पूर्ण शाकाहारी बनतो. काही कुटुंबे महिनाभर शाकाहार पाळतात. श्रावणातील सोमवारी गोव्याबाहेर धार्मिक स्थळांवर जाऊन अभिषेक, पूजा अर्चा करण्याची प्रथाही आहे. संपूर्ण शाकाहार पाळून पूर्ण सात्विकतेने अध्यात्मिक विधी करणे, हे गोव्यातील श्रावणमासव्रताचे वैशिष्टय़ आहे.
यंदा कोरोनामुळे श्रावण मासातील धार्मिक विधीवर नियंत्रण आले आहे. लोकांच्या उत्साहावर थोडेसे विरजण पडले आहे. मंदिरांना कुलुपे लावण्याची पाळी आली आहे. तरीही लोकांमधील धार्मिकता व भावनिकता कायम आहे. त्यामुळे लोक कोरोनाचे संकट विसरून श्रावणमासाची आतुरतेने वाट पाहत आहेत. घरोघरी राहूनच संपूर्ण श्रावणमासाचे व्रताचरण करण्यासाठी गोमंतकीय हिंदू बांधव सज्ज झाले आहेत. हिंदू धर्मात श्रावण मासाचे महत्त्व खूप मोठे आहे. याच मासात रक्षाबंधन, गोकुळाष्टमी, नागपंचमी, आयतार पूजन असे अनेक सण येतात. श्रावण सुरु असतानाच श्रीगणेशाच्या आगमनाचेही वेध गोमंतकीयांना लागलेले असतात. श्रावण संपताच भाद्रपद चतुर्थीला साजरी होणारी गणेशचतुर्थी म्हणजे एक दिव्य पर्वणी ठरते.