दोडामार्ग – वार्ताहर-
आंबेली येथील माणगावकरवाडी – आवळीचे भरड मधील ग्रामस्थांना गेल्या नऊ महिन्यांपासून नळपाणी योजनेचे पाणी नाही. येत्या 14 ऑगस्टपर्यंत पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास 15 ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत कार्यलयासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा या वाडीतील ग्रामस्थांनी दिला आहे. झरेबांबर – आंबेली या ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच यांना तसे निवेदनही देण्यात आले आहे.
गेल्या आठ- नऊ महिन्यांनापासून गावच्या नळपाणी योजने अंतर्गतचे पाणी मिळत नसून सध्या पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते आहे. त्यामुळे अनेक साथीचे विकार, आजार पसरण्याची शक्यता आहे. येत्या 14 ऑगस्टपर्यंत सुरळीत पाणी पुरवठा न झाल्यास ग्रामपंचायत कार्यालयामोर ठिय्या आंदोलनाचा इशारा या वाडीतील ग्रामस्थांनी दिला आहे. या निवेदनात ग्रा. पं. सदस्य साधना माणगावकर, महादेव दळवी, पार्वती दळवी, रवींद्र दळवी, रसिका दळवी, मयंक दळवी, कुणाल दळवी, सुनील दळवी, सृष्टी दळवी यांच्या सह्या आहेत.