प्रतिनिधी / बेळगाव :
कोरोना संकट काळात आशा कार्यकर्त्या रात्रंदिवस काम करत आहेत. मात्र त्यांना अजूनही तुटपुंजे वेतन देण्यात येत आहे. किमान 12 हजार रुपये वेतन द्यावे, अशी मागणी आशा कार्यकर्त्यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱयांकडे केली आहे.
जानेवारीपासून आतापर्यंत आम्ही सातवेळा निवेदन दिले आहे. आम्हाला बैठकीला बोलवा, अशी मागणी केली आहे. मात्र अद्याप बैठकीला बोलविण्यात आले नाही. हे निषेधार्थ आहे. आरोग्य विभागाच्या सूचनेनुसार आजपर्यंत आशा कार्यकर्त्यांनी कोरोनाबाबत कार्य केले आहेत. कोरोना वॉरियर्स म्हणून त्यांना सन्मानित केले आहे. मात्र वेतन तुटपुंजे आहे. त्यामध्ये जीवन जगणे कठीण आहे.
कोरोना जनजागृतीबाबत काम करत असताना मास्क, सॅनिटायझर व इतर वस्तु देणे गरजेचे होते. मात्र त्यांना कोणत्याच वस्तू देण्यात आल्या नाहीत. त्यामुळे अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे. तेंव्हा आशा कार्यकर्त्यांना संरक्षणासाठी सर्व साहित्य द्यावे, आशा कार्यकर्त्यांना 2 हजारपासून 5 हजारपर्यंत पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. मात्र अद्याप ते देण्यात आले नाही. तेंव्हा तातडीने ती रक्कम देण्यात यावी, अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी एल. जुडगण्णावर यांच्यासह आशा कार्यकर्त्या उपस्थित होत्या.