वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आशियाई युवा आणि कनिष्ठांच्या पुरूष आणि महिलांच्या मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारतीय स्पर्धकांनी शानदार कामगिरी करताना एकूण 39 पदकांची कमाई केली. यामध्ये सहा सुवर्ण, नऊ रौप्य आणि पाच कांस्यपदकांचा समावेश आहे. कोरोना महामारी समस्येमुळे लादण्यात आलेल्या प्रवासावरील निर्बंधामुळे अनेक देशांच्या स्पर्धकांनी महिला विभागात माघार घेतली होती.
महिलांच्या युवा विभागात भारताच्या प्रीती दहिया (60 किलो), स्नेहा कुमारी (66 किलो), खुशी (75 किलो) आणि नेहा (54 किलो) यांनी सुवर्णपदके मिळविली. भारताच्या 10 महिलांनी विविध वजनगटात अंतिम फेरी गाठली होती. त्यापैकी भारताच्या 6 महिलांनी थेट अंतिम फेरीत प्रवेश मिळविला होता. प्रीती दहियाने कझाकस्तानच्या शेयाकमिटोव्हाचा 3-2, स्नेहा कुमारीने संयुक्त अरब अमिरातच्या खलिफानचा पराभव केला. खुशीने कझाकस्तानच्या डिडेचा 3-0 असा पराभव करत सुवर्णपदक मिळविले. पुरूषांच्या विभागात भारताच्या बिश्वामित्र चोंगथमने 51 किलो गटात तर विशालने 80 किलो गटात सुवर्णपदके मिळविली. महिलांच्या विभागात भारताच्या प्रीतीने 57 किलो वजनगटात, खुशीने 63 किलो गटात, तनिशा संधुने 81 किलो गटात, निवेदिताने 48 किलो गटात, तमन्नाने 50 किलो गटात, सिमरनने 52 किलो गटात त्याचप्रमाणे पुरूष विभागात विश्वनाथ सुरेशने 48 किलो गटात, वंशजने 63.5 किलो गटात, जयदीप रावतने 71 किलो वजनगटात भारताला रौप्य पदके मिळवून दिली.
तत्पूर्वी, युवा विभागात भारताच्या पाच स्पर्धकांनी कांस्यपदके मिळविली असून त्यामध्ये एका महिला स्पर्धकांचा समावेश आहे. भारताच्या दक्ष सिंगने 67 किलो गटात, दीपकने 75 किलो गटात, अभिमन्यूने 92 किलो गटात, अमन सिंग बिस्तने 92 किलोवरील गटात तसेच लशु यादवने महिलांच्या 70 किलो वजनगटात कांस्यपदक पटकाविले. मंगोलियामध्ये यापूर्वी झालेल्या आशियाई युवा मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताने पाच सुवर्णपदकांसह एकूण 12 पदके मिळविली होती.
युवा गटातील सुवर्णपदक विजेत्याला 6000 डॉलर्स, रौप्यपदक विजेत्याला 3000 डॉलर्स आणि कांस्यपदक विजेत्याला 1500 डॉलर्सचे बक्षीस देण्यात आले. कनिष्ठांच्या विभागात भारताने यापूर्वी आठ सुवर्ण, पाच रौप्य आणि सहा कांस्य अशी एकूण 19 पदके मिळविली आहेत. या स्पर्धेत भारतीय स्पर्धकांची कामगिरी दर्जेदार झाल्याने अखिल भारतीय मुष्टीयुद्ध फेडरेशनतर्फे अध्यक्ष अजय सिंग यांनी पदक विजेत्यांचे अभिनंदन केले आहे.