वृत्तसंस्था/ जकार्ता
आशिया चषक पुरुषांच्या हॉकी स्पर्धेत मंगळवारी अ गटातील झालेल्या सामन्यात जपानने भारताचा 5-2 अशा गोलफरकाने पराभव केला. या स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या सरदारसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली अननुभवी खेळाडूंचा सहभाग असलेला भारतीय संघ स्पर्धेबाहेर पडण्याच्या मार्गावर आहे. पाक व जपान यांच्यातील सामन्यावर भारताच्या बाद फेरीचे भवितव्य अवलंबून असेल.
या स्पर्धेतील सोमवारी झालेल्या सलामीच्या सामन्यात भारताने पाकला बरोबरीत रोखले आहे. अ गटातील आता शेवटचा सामना यजमान इंडोनेशिया बरोबर होणार आहे. हा सामना भारताने मोठय़ा फरकाने जिंकला तरीही त्यांना बाद फेरीत प्रवेश मिळविणे अवघड आहे. मंगळवारच्या सामन्यात जपानतर्फे केन नागायोशीने एक गोल तर कोसेई कावाबेने दोन गोल तसेच रिओमी ओका आणि कोझी यामासाकी यांनी प्रत्येकी एक गोल केला. भारतातर्फे पवन राजभर आणि उत्तमसिंग यांनी प्रत्येकी एक गोल नोंदविला. या सामन्यात भारतीय संघाने गोल करण्याच्या अनेक संधी गमविल्या. भारतीय संघातील अनुभवी खेळाडू विरेंद्र लाक्रा आणि एस. व्ही. सुनील यांची कामगिरी निराशजनक झाली. या सामन्यातील मध्यंतरापर्यंत या दोन्ही खेळाडूंना सूर मिळाला नाही.
सामन्याच्या उत्तरार्धात भारतीय संघाचा खेळ पूर्वार्धातील खेळाच्या तुलनेत थोडा बऱयापैकी झाला. जपानच्या खेळाडूंनी आक्रमक चाली करत भारतीय बचाव फळीवर शेवटपर्यंत दडपण ठेवले. 24 व्या मिनिटाला नागायोशीने पेनल्टी कॉर्नरवर जपानचे खाते उघडले. 40 व्या मिनिटाला कावाबेने जपानचा दुसरा तर वैयक्तिक पहिला गोल नोंदविला. जपानचा तिसरा गोल ओकाने नोंदविला. भारताचा पहिला गोल 49 क्या मिनिटाला पवन राजभरने केला. भारताचा दुसरा गोल उत्तमसिंगने नोंदविला. त्यामुळे जपानची आघाडी थोडी कमी झाली. कावाबे आणि यामासाकी यांनी जपानतर्फे आणखी दोन गोल नोंदवून भारताचे आव्हान संपुष्टात आणले.