चिपळूण बचाव समितीचा निर्णय, पत्रकार परिषदेत दिली माहिती
प्रतिनिधी/ चिपळूण
गाळ काढण्यासह तब्बल 10 मागण्यांठी गेल्या 28 दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणाची साखळी 29व्या दिवशी 3 जानेवारी रोजी तुटणार आहे. गाळ काढण्याचे काम वेगाने सुरू असल्याने त्यावर लक्ष ठेवण्यासाठी अन्य मागण्यांचे लेखी आश्वासन घेऊन हे उपोषण स्थगित केले जाणार असल्याचे चिपळूण बचाव समितीने रविवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता विजय गोगरे हे समितीची भेट घेणार असून त्यांच्याशी चर्चा करून व पत्र घेऊन उपोषण स्थगित केल्याची घोषणा केली जाणार आहे. शिवनदीतील गाळ काढण्यासाठी नाम फाऊंडेशन मोफत यंत्रणा देणार असून दोन दिवसांत या कामाला सुरूवात होणार असल्याचे सांगितले गेले.
समितीचे बापू काणे, अरूण भोजने, सतीश कदम, शिरीष काटकर, किशोर रेडीज, उदय ओतारी, शहानवाज शहा, महेंद्र कासेकर यांनी या पत्रकार परिषदेत माहिती देताना पुढे सांगितले की, यावर्षी आलेल्या महापुराला कारणीभूत असलेल्या वाशिष्ठी व शिवनदीतील गाळ काढला जावा या प्रमुख मागणीसह 10 मागण्यांसाठी बचाव समितीने गेल्या 28 दिवसांपासून साखळी उपोषण सुरू केले आहे. नागरिक, व्यापारी, लगतची गावे यांच्या पाठिब्यामुळे मोठा दबावगट निर्माण करण्यात समितीला यश आले. त्यामुळेच गाळ काढण्यासाठी राज्यातील यंत्रणा सरकारने येथे आणली आहे. 90 टक्के यंत्रणा कामाला लागली असून उर्वरित यंत्रणा 2 दिवसांत येणार आहे. गाळासह स्वयंचलित अत्याधुनिक पर्जन्यमापक यंत्रणा, कोळकेवाडी धरणातून किती पाणी सोडले, हे अचूक सांगणारी यंत्रणा, पाणी सोडण्यासह अन्य निर्णय घेण्यासाठी सर्व समावेक्षक कमिटीची स्थापना, नदी संवर्धनासाठी भरीव निधी देण्यासह अनेक मागण्या मान्य करण्याचे आश्वासन शासन व प्रशासनाने समितीला दिले आहे.
सध्याचा विचार करता गाळ काढण्यापेक्षा तो योग्य पध्दतीने काढून घेणे महत्वाचे आहे. त्यामुळे उपोषण स्थगित करून या कामावर लक्ष देणे आम्हांला जास्त महत्वाचे वाटत आहे. त्यामुळे अन्य मागण्यांचे आश्वासन कसे हवे, याचा नमुना आम्ही प्रशासनाला दिला आहे. त्यामुळे नमुन्यानुसार लेखी आश्वासन 3 जानेवारीला जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता गोगरे यांच्याकडून मिळणार आहे. ते येथे येणार असून आम्ही त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. त्यानंतर उपोषण स्थगित करण्याची घोषणा केली जाणार असून अन्य मागण्यांचे दिलेले लेखी आश्वासन पाळले गेले नाही तर पुन्हा उपोषण केले जाणार असल्याचे या सर्वांनी नमूद केले.
शिवनदीतील गाळ काढण्यासाठी नाम फाऊंडेशन मोफत यंत्रणा देणार असून त्याच्या इंधनाचा खर्च शासन करणार आहे. त्यासाठी फाऊंडेशनच्या काही मशिनरी आल्या असून उर्वरित येणार आहेत. त्यामुळे 2 दिवसांत शिवनदीतील गाळही काढण्याचे काम सुरू होईल, असेही सांगितले. गाळ काढण्याच्या कामावर समिती बारकाईने लक्ष ठेवणार असून दररोज सायंकाळी कामाचा आढावा घेऊन त्यावर चर्चा केली जाणार आहे. गाळ काढण्याच्या कामासाठी आलेले कर्मचारी बाहेरील आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून काही त्रुटी रहात असल्यास थेट त्यांच्याशी वाद न घालता या त्रुटी समितीच्या लक्षात आणून द्याव्यात, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
भिकेचे 21 हजार देणार शासनाला
साखळी उपोषणादरम्यान करण्यात आलेल्या भिक मांगो आंदोलनात 21 हजार रूपये जमा झाले. हे पैसे 3 जानेवारी रोजी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा केले जाणार असल्याचेही यावेळी जाहीर करण्यात आले.
आमदारांचे मोठे योगदान
गाळ काढण्याचा मुख्य प्रश्न सोडवण्यासाठी सर्वच पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले आहेत. मात्र आमदार शेखर निकम यांचे यात सर्वात मोठे योगदान असल्याचे काटकर यांनी स्पष्ट केले. ते सध्या कोरोना पॉझिटिव्ह आहेत. तरीही तन, मनाने ते कायम समितीच्या संपर्कात असल्याचेही त्यांनी नमूद केले.