केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे प्रतिपादन : जागतिक स्टार्टअपशी प्रतिस्पर्धा : शांतता अन् विकासाचे पर्व
वृत्तसंस्था/ गुवाहाटी
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आसाम दौऱयादरम्यान अनेक मोठय़ा विकासकामांचा शुभारंभ करत एका जाहीर सभेला शनिवारी संबोधित केले आहे. पूर्वीच्या काळात 5 वर्षांमध्ये एखादा पंतप्रधान एक किंवा दोनदाच ईशान्येत यायचा, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागील 6 वर्षात 30 वेळा ईशान्येचा दौरा केला असून प्रत्येकवेळी मोठी भेट प्रदान केल्याचे उद्गार शाह यांनी काढले आहेत. एकेकाळी ईशान्येतील सर्व राज्यांमध्ये फुटिरवादी स्वतःचे धोरण राबवत होते, तरुणाईच्या हातात बंदूक देत होते. परंतु आज या संघटना मुख्य प्रवाहात सामील झाल्या असून तरुणाई स्वतःच्या नव्या स्टार्टअपसोबत जगभरातील युवांशी स्पर्धा करत असल्याचे शाह म्हणाले.
मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्या नेतृत्वाखाली आसामच्या चहामळय़ांसाठी अनेक कार्ये करण्यात आली आहेत. सर्वप्रथम 7.20 लाख कामगारांच्या बँक खात्यात रक्कम जमा करून त्यांना दलालांपासून दवाचविण्याचे काम सोनोवाल यांनी केल्याचे विधान गृहमंत्र्यांनी केले आहे.
पुढील वर्षी निवडणूक
आसाममध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होणार असल्याने केंद्रीय गृहमंत्र्यांचा हा दौरा अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे. आसाममध्ये सुमारे साडेचार वर्षांपासून विकासाचे पर्व मोदींच्या नेतृत्वाखाली सर्वानंद सोनोवाल आणि हेमंत विश्वा शर्मा यांच्या जोडीने आसाममध्ये पुढे नेले आहे. आसामला एक करण्यासाठी, राज्याच्या जनतेला एक करण्यासाठी, आसामला भारतासोबत जोडण्यासाठी, जगात गुरु शंकर देव यांचा संदेश पोहोचण्यासाठी एक अत्यंत मोठा कार्यक्रम आसाममध्ये होणार असल्याचे शाह यांनी म्हटले आहे.
आश्वासनांची पूर्तता
श्रीमंत शंकरदेव यांच्या जन्मस्थानी घुसखोरांनी कब्जा केला होता, तेथून घुसखोरांना हाकलून शंकरदेव यांच्या महान स्मृतींना चिरकाळापर्यंत कायम ठेवण्याचे काम हेमंत विश्वा शर्मा आणि मुख्यमंत्री सोनोवाल यांनी चालविले आहे. आसाममध्ये विविध गोष्टींवरून आंदोलने झाली, शेकडो जण मारले गेले. आसामची शांतता भंग करून राज्याचा विकास रोखण्यात आला होता. परंतु मोदींनी आसामच्या जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करत राज्यात विकासाचे पर्व सुरू केल्याचे शाह म्हणाले.
ईशान्येचा विकास ईशान्येच्या विकासाला केंद्रस्थानी ठेवून मोदींनी 6 वर्षे सरकार चालविले आहे. पुढील काळातही आमचे सरकार याचप्रकारे ईशान्येची सेवा करत राहणार आहे. राज्यात 11 कायदा महाविद्यालयांच्या स्थापनेच्या कार्याचा शुभारंभ करण्यात आला आहे. आसामने या देशाला रंजन गोगोई यांच्या स्वरुपात सरन्यायाधीश देण्याचे काम केले आहे, असे उद्गार शाह यांनी काढले आहेत.