मतदानापूर्वीच्या अंतिम मतचाचण्यांचे निष्कर्ष
@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था
चार राज्ये व एक केंद्रशासित प्रदेश यांच्यातील विधानसभा निवडणुका आता ऐन तोंडावर आल्या असून मतदानाचा पहिला टप्पा 27 मार्च या दिवशी होणार आहे. त्याआधी अनेक मतदान चाचणी संस्थांनी त्यांचे अंतिम निष्कर्ष सादर केले आहेत. त्यानुसार आसाम हे राज्य आणि पुदुच्चेरी हा केंद्रशासित प्रदेश येथे भाजप व त्याचे मित्रपक्ष विजयी होणार असून तामिळनाडूत द्रमुक तर केरळमध्ये डावी आघाडी स्पष्ट बहुमत मिळविणार आहे. खरी चुरस पश्चिम बंगालमध्ये असून तेथे भारतीय जनता पक्ष आणि तृणमूल काँगेस यांच्यात तीव्र चुरस आहे.
चार मतदानचाचणी संस्थांचे अहवाल बुधवारी विविध वृत्त वाहिन्यांवरून सादर करण्यात आले. त्यांच्या अनुमानांमध्ये बरीच विसंगती व अंतर दिसून येते. विशेषतः पश्चिम बंगालच्या संदर्भात या चाचण्यांमध्ये पुष्कळच अंतर असल्याचे स्पष्ट होत आहे. तेथे निवडणूक अत्यंत चुरशीची होणार यावर मात्र या अहवालांचे एकमत आहे. तसेच दक्षिणेतील केरळ, तामिळनाडू आणि पुदुच्चेरी यांच्यासंदर्भातही जवळपास एकमत आहे. आसाममध्ये भाजप व मित्रपक्षांच्या जागा कमी होणार असल्या तरी बहुमत मात्र, त्यांच्याकडेच राहील असा निष्कर्ष आहे. तर पुदुच्चेरी हा भाजपला सत्ता देणारा कर्नाटकानंतर दक्षिणेतील दुसरा प्रदेश ठरेल असे भाकित वर्तविण्यात आले आहे. पश्चिम बंगालमध्ये मात्र परिणामांची अनिश्चितता आहे.
प्रदीर्घ काळ मतदान
ही सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात 27 मार्च ते 29 एप्रिल असा प्रदीर्घ काळ मतदान प्रक्रिया चालेल. 27 मार्च, 1 एप्रिल, 6 एप्रिल, 10 एप्रिल, 17 एप्रिल, 22 एप्रिल, 26 एप्रिल आणि 29 एप्रिल अशा आठ टप्प्यांमध्ये मतदान होईल. आसाममध्ये तीन टप्प्यांमध्ये, पश्चिम बंगालमध्ये 8 टप्प्यांमध्ये तर इतर दोन राज्ये व केंद्रशासित प्रदेशात एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. याशिवाय लोकसभेच्या दोन जागा आणि विधानसभांच्या 10 जागांवर पोटनिवडणुका होणार असून त्याही याच निवडणुकांसमवेत होणार आहेत. सर्व निवडणुकांची मतगणना 2 मे 2021 या दिवशी होणार असून त्याच दिवशी रात्रीपर्यंत परिणाम येणार आहेत.
नंदिग्रामचे आकर्षण सर्वाधिक
पश्चिम बंगालमधील नंदिग्राम मतदारसंघ हा या सर्व निवडणुकांमध्ये सर्वाधिक आकर्षणाचे केंद्र बनला आहे. या मतदारसंघात ममता बॅनर्जी आणि एकेकाळचे त्यांचेच उजवे हात मानले गेलेले सुवेंदू अधिकारी यांच्यात होत आहे. या दोघांपैकी कोणाचा विजय होईल, हे आतापर्यंतच्या स्थितीनुसार निश्चितपणे सांगता येणार नाही, असे अनेक अभ्यासकांचे व मतदानतज्ञांचे मत आहे.