कुंभोज / वार्ताहर
कुंभोज, ता. हातकणंगले येथे इंदिरानगर वारणा प्रकल्प परिसरात ग्रामपंचायतने गावातील गोळा केलेला कचरा प्रकल्पाच्या जागेत एकत्रित गोळा केल्याने कचऱ्याचे ढिग झाले आहेत, वाऱ्यामुळे परिसरात सर्वत्र विस्कटला गेला आहे. परिणामी त्यामुळे इंदिरानगर परिसरातील लोकवस्तीत कचऱ्याचे मोठ्या प्रमाणात साम्राज्य पसरले असून, वारणा प्रकल्पातील प्लास्टिकच्या पिशव्या व नागरिकांनी अन्य वापरात आणलेले साहित्य अस्ताव्यस्त पसरलेले दिसत आहे.
परिणामी एकत्रित केलेल्या कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले असून परिसरातील नागरिकांच्यातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. ग्रामपंचायतीने हा कचरा गोळा करून, त्यासाठी कचरा व्यवस्थापन प्रकल्प उभा करावा व सदर कचऱ्याची विल्हेवाट लावावी अशी मागणीही परिसरातील नागरिकातून होत आहे. महाराष्ट्र शासनाचा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प व गोवर्धन प्रकल्प ग्रामपंचायत कुंभोज यांना मंजूर झाला असून या प्रकल्पाला अनेक ठिकाणी विरोध होत असल्याने ग्रामपंचायतीने प्रकल्प कोठे उभा करावा याबद्दल संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. परिणामी हा प्रकल्प योग्य ठिकाणी उभा राहिल्यास कचऱ्याचा प्रश्न जाणवणार नाही असे ग्रामपंचायत कुंभोज येथिल पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
सध्या कचरा मोठ्या प्रमाणात आजूबाजूला राहत असलेल्या सर्वच नागरिकांच्या घरांमध्ये वार्यामुळे जात असून परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झाले आहे. कचराच्या ठिकाणी ऊस तोडणी कामगारांच्या अनेक टोळ्या वास्तव्यास असून त्यांना या कचऱ्याचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. एकत्रित साठलेल्या कचऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात डासांची पैदास झाली असून त्यामुळे परिसरातील अनेक नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. याबाबत ग्रामपंचायत कुंभोज यांनी लवकरात लवकर निर्णय घेऊन घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभा करावा व कचऱ्याची विल्हेवाट लावावी अन्यथा इंदिरानगर वारणा प्रकल्प परिसरात टाकण्यात येणारा कचरा टाकण्यात येऊ नये, असा इशाराही परिसरातील नागरिकांच्या वतीने देण्यात आला आहे.