छत्तीसगड देशातील सर्वात स्वच्छ राज्य
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून स्वच्छ शहरांना स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार 2021 प्रदान करण्यात आले आहेत. केंद्र सरकारकडून इंदोरला सलग 5 व्यांदा देशातील सर्वात स्वच्छ शहर घोषित करण्यात आले. सूरतला याप्रकरणी दुसरे तर आंध्रप्रदेशच्या विजयवाडा शहराला तिसऱया क्रमांकाचे स्वच्छ शहर म्हणून गौरविण्यात आले. तर केंद्र सरकारच्या वार्षिक स्वच्छता सर्वेक्षणात सर्वात स्वच्छ गंगा शहराच्या शेणीत उत्तरप्रदेशातील वाराणसीला पहिले स्थान मिळाले आहे.
दिल्लीत आयोजित ‘स्वच्छ अमृत महोत्सव’ कार्यक्रमाला राष्ट्रपती कोविंद यांनी संबोधित केले. देशवासीयांच्या मानसिकतेत बदल हेच स्वच्छ भारत अभियानाचे अत्यंत मोठे यश आहे. आज हा बदल व्यापक स्तरावर झाला आहे. कित्येक कुटुंबांमध्ये छोटी मुले देखील मोठय़ा लोकांना अस्वच्छता करण्यापासून रोखतात. अशा बदलासाठी देशवासीयांचे अभिनंदन करतो. स्वच्छता अभियानाच्या यशासाटी सफाई मित्र आणि सफाई कर्मचाऱयांचे विशेष स्वरुपात कौतुक करत असल्याचे राष्ट्रपती म्हणाले.
मैला वाहून नेणे एक लाजिरवाणी प्रथा आहे. ती रोखण्याची जबाबदारी केवळ सरकारची नव्हे तर समाज आणि देशातील सर्व नागरिकांची आहे. सर्व शहरांमध्ये यंत्रांद्वारे सफाईची सुविधा उपलब्ध करण्यात यावी अशी सूचना राष्ट्रपतींनी यावेळी केली.
वार्षिक स्वच्छता सर्वेक्षणात छत्तीसगडला भारतातील सर्वात स्वच्छ राज्य घोषित करण्यात आले. राष्ट्रपतींकडून 342 शहरांना कचरामुक्त शहर आणि् सफाईमित्र चॅलेंजच्या शेणीमध्ये पुरस्कार देण्यात आला. स्वच्छ सर्वेक्षण 2021 मध्ये एकूण 4,320 शहरांनी भाग घेतला होता. शहरांना सर्वसाधारणपणे स्टार सिस्टीमचा अवलंब करत मानाकंन देण्यात आले. यंदा 342 शहरांना स्टार रेटिंग अंतर्गत प्रमाणपत्र देण्यात आले. यात 5 स्टार प्राप्त 9 शहरे, 3 स्टार प्राप्त 166 शहरे, एक स्टारप्राप्त 167 शहरांचा समावेश आहे. 6 राज्ये आणि 6 केंद्रशासित प्रदेशांनी स्वतःच्या कामगिरीत 5 ते 25 टक्क्यांपर्यंत सुधारणा घडवून आणल्याचे सरकारकडून म्हटले गेले.
कचऱयातून मोठी कमाई
इंदोरला सर्वात स्वच्छ शहराचा मान मिळण्यामागे सुका तसेच ओल्या कचऱयावरील प्रक्रियेतून कमाईचा मार्ग शोधणे आणि मोठय़ा प्रमाणावर सांडपाण्यावर प्रक्रिया करत ते पुन्हा वापरात आणण्याची कामगिरी सामील आहे. शहरात सरासरी 300 एमएलडी (दशलक्ष लिटर प्रतिदिन) सांडपाणी तयार होते आणि विविध भागांमधील विशेष प्रकल्पांमध्ये त्यावर प्रक्रियेनंतर 110 एमएलडी पाणी सार्वजनिक उद्याने, शेती आणि बांधकामांमध्ये वापरण्यात येते.