प्रा. डॉ. सुनीलकुमार लवटे यांचे मत : संस्कृतीसाठी भाषा जगविणे आवश्यक : मराठी भाषा गौरव दिन वरेरकर नाटय़ संघ येथे साजरा
प्रतिनिधी /बेळगाव
इतर भाषांचा दुःस्वास करून स्वभाषेचा विकास अशक्मय आहे. भाषा टिकविण्यासाठी भाषेचा जाज्वल्य अभिमानच हवा. भाषा संस्कृती जपण्याचे काम करत असते. नव्या पिढीच्या जीभेवर मराठी भाषा खेळायची असेल तर संस्कृती जपायला हवी. स्वयंपाक घरात भाषा जिवंत राहिली तेथे देश जिवंत राहतो, असे विचार साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी व्यक्त केले.
राज्य मराठी विकास संस्था मुंबई अनुदान योजनेंतर्गत लोकमान्य ग्रंथालय, वरेरकर नाटय़ संघ, वाङ्मय चर्चा मंडळ, सरस्वती वाचनालय यांच्यावतीने मराठी भाषा गौरव दिन वरेरकर नाटय़ संघ येथे साजरा करण्यात आला. त्यावेळी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर लोकमान्य सोसायटीचे चेअरमन किरण ठाकुर, लोकमान्य ग्रंथालयातर्फे जगदीश कुंटे, वाङ्मय चर्चा मंडळातर्फे प्रा. अनिल पाटणेकर व सरस्वती वाचनालयातर्फे स्वरुपा इनामदार आदी उपस्थित होते.
डॉ. लवटे म्हणाले, मराठी गौरव भाषा दिनाला फार मोठा इतिहास आहे. त्यामध्ये बेळगावचा सहभाग महत्त्वाचा आहे. 1946 मध्ये बेळगावला झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये ग. त्र्यं. माडखोलकर यांनी संयुक्त महाराष्ट्राचा ठराव मांडला होता. त्यानंतर अनेक घडामोडी घडल्या. परंतु मराठीची वकिली करण्यामध्ये आणि महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये बाबुराव ठाकुर यांची शिलेदारी फार मोलाची होती, याचा उल्लेख वक्त्यांनी केला.
आज भाषेचा जागतिक नकाशा गतीने बदलतो आहे. भाषिक नकाशा बदलणे याचा अर्थ एखाद्या भाषेची लोकसंख्या बदलणे. गेल्या 50 वर्षांत अडीचशे भाषा मृत झाल्या. संस्कृती, प्रांत, देश यांचा अभिमान हवा तर भाषा जगविली पाहिजे. कारण ‘भाषा मरते तेव्हा देशही मरतो, संस्कृतीचा मग दिवाही विझतो’, याकडे डॉ. लवटे यांनी लक्ष वेधले.
बंगाली लोकांचे अनुकरण आवश्यक
90 पूर्वीच्या राष्ट्रांच्या प्रादेशिक अस्मिता स्वातंत्र्यानंतर तीव्र झाल्या. परंतु एका भाषेचा दुःस्वास करून स्व-भाषेचा विकास कधीच होत नाही. आपण बंगाली लोकांचे अनुकरण केले पाहिजे. ते घरात कोणत्याही परिस्थितीत बंगाली बोलतात. प्राथमिक शिक्षण बंगाली भाषेत घेतात. उच्चशिक्षण इंग्रजीमध्ये घेतात. आपणही याचे अनुकरण करावे. नव्या पिढीच्या जीभेवर मराठी खेळायची असेल तर आपल्याला भाषेचे पुनरुज्जीवन करावे लागेल. जगामध्ये ज्यांनी ज्यांनी इतर भाषा स्वीकारल्या ते आता मूळ भाषेकडे परतत आहेत. अशा वेळी आपण मागे राहून चालणार नाही. कारण भाषेची सक्ती सत्ता उलटविण्याइतपत समर्थ असते. हे आपण लक्षात घ्यायला हवे, असे सांगून डॉ. लवटे यांनी समारोप केला.
अध्यक्षीय समारोप करताना स्वरुपा इनामदार यांनी प्रतिकुल परिस्थितीमध्ये बेळगावातील सर्व मराठी संस्था, मराठी भाषेची धुरा प्रचंड सामर्थ्याने पेलत आहेत, असे सांगितले व काही संस्थांचा त्यांनी उल्लेख केला.
प्रारंभी जगदीश कुंटे यांनी प्रास्ताविक केले. मनीषा सुभेदार यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला. प्रा. अनिल पाटणेकर यांनी वक्त्यांचा गौरव केला. वाङ्मय चर्चा मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बक्षिसांचे वितरण डॉ. लवटे यांच्या हस्ते करण्यात आले. विजेत्यांची नावे माधव कुंटे यांनी वाचली. सूत्रसंचालन किशोर काकडे यांनी केले. प्रा. अनघा वैद्य यांनी आभार मानले.
मराठी माणसे एकत्र येणे अपेक्षित : किरण ठाकुर
किरण ठाकुर म्हणाले, मराठी माणूस आपली भाषा लगेच सोडण्यास तयार असतो. आपण अनेक भाषांतील शब्द घेऊन ते प्रचलित केले पाहिजेत. मराठी माणसे ठिकठिकाणी काम करत आहेत. पण त्यांचे एकत्र येणे अपेक्षित आहे. आपण किशोर मासिकाचे अंक सर्व मराठी शाळांसाठी पाठवत आहोत आणि मुलांना मराठी शिकवता येईल अशी पुस्तके छापण्यासाठी विचार करत आहोत, असे ठाकुर म्हणाले.