प्रतिनिधी / वारणानगर
इपीएस -९५ च्या पेन्शनरांची पेन्शन वाढ होणार. ६३ लाख पेन्शनरांचा फायदा, पेन्शनर होणार मालामाल, केंद्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय , अशा बातम्या सोशल मीडियावर पसरविण्यात येत आहेत. त्या बातम्या निराधार व खोट्या असून अशा अफवावर पेन्शनदारांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन निवृत्त कर्मचारी ईपीएस ९५ राष्ट्रीय समन्वय समितीचे समन्वयक दिलीप पाटील यांनी केले आहे.
पेन्शनवाढीच्या चुकीच्या माहिती पसरवण्याने सेवानिवृत्त झालेले गरीब , अशिक्षित, वयोवृद्ध पेन्शन धारकांचा गैरसमज होत आहे. या माहितीची सत्यता पडताळण्यासाठी पेन्शनर संघटनेकडे विचारपूस करू लागले आहेत. गेले पंधरा दिवस सोशल मिडीयावर पेन्शनवाढीच्या बातमीचा खोटा खेदजनक प्रकार सुरू असून पेन्शनर अस्वस्थ झाले आहेत. असे समन्वयक दिलीप पाटील यानी सांगून केंद्र सरकारच्या अशा खोट्या बातम्या पसरवणाऱ्या प्रचारकांनी तारतम्य बाळगावे, “जे नाही ” त्याचा उगाच प्रचार आणि प्रसार करु नये असे सांगीतले.
पेन्शन विकल्यास, १५ वर्षांनंतर विकणाऱ्यांची पेन्शन पुर्वरत होउन , पुर्ण पेन्शन मिळणार असा नियम केंद्र सरकारच्या कर्मचार्यां करीता आहे. परंतु अशा प्रकारची तरतूद इपीएस-९५ मध्ये नव्हती आणि म्हणून १५ वर्षे झाल्यानंतर सुद्धा पेन्शन कपात चालूच राहायची ( पेन्शन कमीच मिळत राहायची) . या अन्यायाविरुद्ध विविध संघटने कडून संघर्ष करण्यांत आला यासाठी मुख्यत्वे केरळ, कोलमचे खासदार एन.के. प्रेमचंद्रन, खा. रामदास तडस यासह देशातील अन्य खासदारांनी पाठबळ देत संसदेत प्रश्न उपस्थित केला. आणि शेवटी सरकारने चुक मान्य करून कायद्यात दुरुस्ती केली. दि.२१-०८-२०१९ ला हैदराबाद येथे झालेल्या सीबीटी च्या २२५व्या बैठकीत यावर निर्णय घेण्यात आला असे समन्वयक दिलीप पाटील यानी सांगीतले.
कायद्यातील दुरुस्तीनतंर
ईपीएस-९५ च्या कायद्यानुसार निवृत्त होणाऱ्या व्यक्तीस त्याच्या निर्धारित पेन्शन पैकी १/३ पेन्शन विकता येत होती. ही सवलत २६-०९-२००८ पासून बंद करण्यात आली. जे कर्मचारी २६-०९-२००८ चे पूर्वी निवृत्त झालेत आणि ज्यांनी आपली १/३ पेन्शन विकून त्या बदल्यात रोख रक्कम घेतली होती त्यांस पंधरा वर्ष पूर्ण झाली आहेत अशा पेन्शनरांना पूर्ववत पेन्शन व जादा कपात केलेली रक्कम फरक म्हणून देण्यासाठी केंद्र सरकारने इपीएस-९५ च्या पेन्शनपोटी, इपीएफोकडे ८६८ व १०५ करोड रुपये दिले होते. त्याची अमंलबजावनी चालू जून महिन्यापासून झाली असून पेन्शन विकलेल्या देशभरातील सहा लाखावर पेन्शनरांना याचा लाभ झाला आहे. त्यामुळे सरसकट पेन्शनवाढ ही अफवा असल्याचे दिलीप पाटील यांनी सांगीतले.