शंभर वर्षांनी आपण नसणारच आहोत. पण तेव्हाचे स्वप्न बघायला काय हरकत आहे. काही दिवसांपूर्वी एक मराठी महिला दागिने खरेदी करायला गेली. दुकानदार आणि नोकर तिच्याशी हिंदीत बोलत होते. तिने मराठी भाषेचा आग्रह धरला. त्यांनी नाकारला. तिने सत्याग्रह केला. ती जिंकली. पण त्यानंतर दुकानदार किंवा नोकर सगळय़ा ग्राहकांशी मराठी बोलायला लागले किंवा नाही हे कळायला मार्ग नाही. पण शंभर वर्षांनी तरी इथे मराठी भाषेला महत्त्व आलेले असेल असे स्वप्न बघावेसे वाटते. 2020 पासून 2120 पर्यंतच्या शंभर वर्षात मराठी माणसाने नेट लावून आर्थिक प्रगती केलेली असेल.
महाराष्ट्राच्या प्रत्येक शहरात, जिह्यात मराठी माणसांनी छोटेमोठे व्यवसाय सुरू केलेले असतील. किराणा माल, स्टेशनरी, फर्निचर, हॉटेल्स, भाज्या-फळांची दुकाने, मॉल्स, पेट्रोल पंप, रियल इस्टेट, कापड दुकाने, पुस्तकांची दुकाने, हार्डवेअर, संगणक, मोबाईल्स वगैरे व्यवसायात नसलेला एकही मराठी माणूस, एकही मराठी कुटुंब शिल्लक राहणार नाही. सर्व व्यवसायांमध्ये अमराठी नोकरवर्ग असेल आणि मराठी मालकांशी मोडक्मया तोडक्मया मराठीत बोलत असेल. महाराष्ट्रात ग्राहक अमराठी असतील. पण दुकानदार, मालक आणि सर्वांशी नाईलाजाने मराठीत बोलत असतील.
सगळी मराठी माणसे अशी दिवसाचे चोवीस तास आणि वर्षाचे बारा महिने अर्थार्जनात मग्न असतील. ती विविध धार्मिक-सांस्कृतिक उपक्रमांसाठी देणग्या देतील. विविध उत्सवांच्या वेळी रस्त्यावर मराठी उद्योजकांच्या जाहिरातींच्या कमानी असतील. अमराठी मुले विविध उत्सवांसाठी वर्गणी मागायला मराठी शेठजींच्या दुकानांपुढे अजीजीने उभी असतील. ‘शेठ कितीची पावती फाडू?’ असे विचारत असतील. वर्षातून एकदा अमराठी नोकर विविध सणांसाठी गावी जायला सुट्टय़ा मागतील तेव्हा मराठी शेठ त्याच्यावर खेकसतील.
मराठी शेठ लोक कुठल्याही सणांमध्ये यात्रांमध्ये वेळ घालवणार नाहीत. महिनोन्महिने देवदेव करत हिंडणार नाहीत याचा अर्थ असा नव्हे की त्यांची धर्मावर श्रद्धा नसेल. त्यांची श्रद्धा असेल. पण ते वर्षभर राबून संपत्ती निर्माण करतील. एखाद्या तीर्थक्षेत्राला भक्कम देणगी देतील. अनुदानासाठी सरकारकडे भीक मागणार नाहीत. मराठी माणसाचे मानबिंदू असलेली सगळी देवस्थाने मराठी उद्योजकांच्या अर्थसहाय्यातूनच चकाचक होतील. मंदिर म्हणजे संगमरवरी फरशा, लख्ख भिंती, भाविकांना मोफत निवास-भोजनाची सोय अशी समीकरणे रूढ होतील.
त्यावेळी मराठी भाषेत कोणी बोलावे म्हणून आंदोलने करायची गरज असेल का? कोण जाणे.