अध्याय दहावा
साधकाची दिशाभूल करताना कर्मवादी व मीमांसक म्हणतात की वेदांत्यानी सांगितल्याप्रमाणे समोर दिसणाऱया वस्तू अनित्य आहेत हेच आम्हाला पटत नाही. सपाटून कर्मे करावीत आणि त्याचे फळ उपभोगावे हेच खरे जीवन आहे. तेव्हा वेदांनी मांडलेल्या स्वर्गादि कल्पना खोटय़ा कशा असतील? तसेच परंपरेने चालत आलेल्या उपभोग्य वस्तू अनित्य आहेत असे कसे म्हणता येईल? वेदांती हे सर्व अनित्य म्हणतात आणि नाव, गाव कशाचाही पत्ता नसलेला ईश्वर सर्वव्यापी आहे असे सांगतात हेच आम्हाला मुळात मान्य नाही. भगवंतांनी कर्मवादी आणि मीमांसक यांचे म्हणणे उद्धवाला सविस्तर सांगितले आणि शेवटी म्हणाले, या कर्मवादी आणि मीमांसक यांचे म्हणणे निखालस खोटे आहे हे मी त्यांच्याच वचनांचा आधार घेऊन तुला समजाऊन सांगतो. निवृत्ती कष्टप्रद आहे म्हणून प्रवृत्ती हीच अत्यंत श्रे÷ असे म्हणतात. परंतु प्रवृत्तीमध्ये काय कमी कष्ट आहेत का? मरणाचे अरिष्ट तर अनिवार्यच आहे. काळ हा अखंड पाठीस लागलेला असतो. बरोबर असणाऱया चोराशी मैत्री केल्याप्रमाणे काळाची पोसणूक आहे. वेळ आली की जीवप्राण सारे लुटून घेतो. प्रवृत्तीचे कष्ट काढता काढता एकदम मृत्यूचा असा तडाका येऊन बसतो की, हाय हाय! नको तो प्रसंग! जीवामध्ये वासनेची हाव दांडगी असते म्हणून ‘गेलो! मेलो! धावा! धावा! या! या!’ असे तो म्हणतो. पण मृत्यूच्या तडाक्मयाचे निवारण कोण करणार? त्यावेळी कोणाचाच उपाय चालत नाही. काळ नुसते मारतो असे नाही, तर आणखी नानाप्रकारच्या यातना भोगावयास लावतो आणि ज्यात अनिवार दुःखे असतात अशा गर्भवासात तो घालतो. गर्भवासातील अत्यंत कष्ट कोणापाशी सांगणार? त्या गर्भाला पोटात काय काय यातना भोगाव्या लागतात हे आईबापांना कळत नाही. त्यातून सोडविणारा तेथे कोणीच नसतो. त्या जीवाची व्यथा जीवालाच माहीत आणि शेवटी नको त्या जागेतून जीव जगात येतो. तेव्हा गर्भवासाहून अधिक दुःख दुसरे कोणते आहे? म्हणून मी म्हणतो प्रवृत्ती श्रे÷ आहे या मताचे अभिमानी बोलतात ते खोटे आहे. प्रवृत्तीत मुळीच सुख नाही. एका जन्माने जन्मही सरत नाही, आणि एका मरणाने मरणही नाहीसे होत नाही. काळ हा जीवाला योनीच्या द्वाराने कोटी कोटी जन्माचे फेरे करवितो. पुन्हा जन्म आणि पुन्हा मृत्यु, हे पाठीमागे लागलेलेच आहे. अशा प्रवृत्तीमध्ये सुख ते काय असणार? भयंकर दुःख मात्र भोगावे लागते.
जन्ममरणाच्या मधल्या काळात तर मोठमोठी दुःखे पीडा देत असतात. चोरांचा हल्ला येईल या भीतीने त्वरेने पळू लागावे तो मध्येच चोर येऊन लुटून नेतात त्याप्रमाणे जन्ममरणाच्या मधला काळ षड्विकार भरून काढतात. आता कर्मवाद्यांच्या मते जीव हा स्वतंत्र कर्म कर्ता आहे पण हे त्यांचे म्हणणे मिथ्या आहे. कारण प्रत्यक्षात जीव परतंत्र असल्याचेच दिसते. जीवाला स्वतंत्रता असती, तर त्याच्या वाटय़ाला दुःख कधीच आले नसते. सदासर्वकाल तो सुखीच राहिला असता आणि ज्यामुळे दुःख पदरी येते ते पापही त्याने कधी केले नसते पण असे कधीच घडत नाही. उलट जीव बिचारा नेहमीच दीन, बापुडवाणा असतो. कर्मे तर करतो पण त्याला कर्माचे फळ देणारा निराळाच असतो. तोच त्याला सुखदुःखे भोगवितो. हे लक्षात ठेव. म्हणून ईश्वरी सत्ता हीच सर्वश्रे÷ आहे. तोच कर्मफळाचा दाता आहे आणि जीव हा सुखदुःखाचा भोक्ता आहे. त्याला कसलीही स्वतंत्रता म्हणून नाही. हे लक्षण पाहिले म्हणजे जेवढे म्हणून जीव आहेत ते सर्व पराधीन म्हणजे मायेच्या आधीन आहेत ही गोष्ट लक्षात येते आणि त्या पराधीनपणामुळेच तो भयंकर सुखदुःख भोगतो. जीव हा स्वतंत्र असून तोच कर्ता आहे हे कर्मवाद्यांचे म्हणणे भगवंतांनी पद्धतशीरपणे खोडून काढले. जीव नुसताच परतंत्र आहे असे नाही तर स्वतःच्या इच्छेविरुद्ध त्याला काळाच्या स्वाधीन व्हावे लागते आणि तो काळ त्याला पुनः पुन्हा गर्भवासात घालतो.