उचगांव /वार्ताहर
शांतीनगर वसाहतीमधील राज मल्लू काळे (वय १७ वर्षे) या तरुणाचा आज सकाळी तापाने मृत्यू झाला. फासेपारधी वसाहतीतील आणखीन पंधरा ते वीसजण तापाने आजारी आहेत. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा बेजबाबदारपणा व दुर्लक्षामुळे वसाहतीतील दोघांचा मृत्यू व आजारी रुग्णांमुळे परिसरात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. सरपंच मालूताई काळे,माजी सरपंच गणेश काळे यांच्यासह सुमारे दोनशे ते तीनशे पुरुष-महिलांचा जमाव प्राथमिक आरोग्य केंद्रासमोरच ठि्य्या आंदोलन केले.
यावेळी तणावाचे वातावरण बनले.गांधीनगर पोलिसांनी जमावाला शांत करण्वयाचा प्रयत्न केला.शेवटी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत कारवाईचे लेखी आश्वासन तसेच गावामध्ये रुग्णांच्या सर्वेक्षणाचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. याबाबतची माहिती अशी की, पंधरा दिवसांपूर्वी शांतीनगर वसाहतीमधील पंधरा वर्षीय मुलगीचा तापाने मृत्यू झाला होता. त्यानंतर गेल्या आठवड्यात राज काळे हा तापाने आजारी पडला. त्याच्यावर खासगी दवाखान्यात उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला. दरम्यान परिसरातील सुमारे पंधरा ते वीस जणांना तापाची लागण झाल्याने त्या रुग्णांनी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात धाव घेतली परंतु येथील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी निष्काळजीपणाने त्यांच्यावर उपचार करण्याचे टाळले. दरम्यान आज सकाळी राज काळे याचा मृत्यू झाल्यानंतर या आजाराची आणि वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदारपणाची जाणीव सर्वांना झाली. त्यामुळे सरपंच सौ. मालूताई काळे \
यांनी पुरुष महिलांसहआरोग्य केंद्रासमोर ठिय्या आंदोलन केले. आंदोलकांना सामोरे जाण्यासाठी अतिरिक्त जिल्हा अधिकारी
फारुख देसाई आणि तालुका आरोग्य अधिकारी जी. डी. नलावडे आले. यावेळी उपस्थित महिलांनी वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. आर. माळगावकर आणि डॉ. बर्गे यांच्या तक्रारींचा पाढाच वाचला. महिलांनी यावेळी संतप्त भावना व्यक्त केल्या. यावेळी माजी सरपंच गणेश काळे यांच्या नेतृत्वाखाली लीकाही काळ रास्ता रोको करण्यात आले. दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर, पोलीस उपनिरीक्षक अतुल कदम यांच्यासह गांधीनगर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आंदोलकांची समजूत
काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी गणेश काळे यांनी कोरोना काळापासून आजअखेर फासेपारधी वसाहतीसह उचगावमध्ये रुग्णांची आरोग्य तपासणी आणि सर्वेक्षणात अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून अक्षम्य दुर्लक्ष झाले असल्याचे सांगितले. यापूर्वी पंधरा दिवसांपूर्वी पंधरा वर्षीच मुलीचा तापाने मृत्यू झाला होता.
आज राज काळे या सतरा वर्षाच्या युवकाचा मृत्यू झाला आहे. आणखीन किती बळी जाण्याची वाट शासकीय यंत्रणापाहणार आहे अशा सवाल गणेश काळे यांनी केला. यानंतर तालुका आरोग्य अधिकारी जी. डी नलावडेयांनी उद्यापासून फासेपारधी वसाहतीसह उचगावमध्ये रुग्णांचे सर्वेक्षण त्वरीत करण्यात येईल. येत्यासतरा तारखेपर्यंत वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात येतील आणि येथून पुढे कर्मचारी भरती त्वरीत करुन दर्जेदार रुग्णसेवा देण्यात येईल असे आश्वासन दिले. यावेळी उपस्थितांनी लेखीआश्वासनाची मागणी केली. यानंतर वरिष्ठांशी चर्चा करुन लेखी पत्र दिले. यानंतर सरपंच मालूताई काळे, माजी सरपंच गणेश काळे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजू यादव, दिपक रेडेकर, राजू काळे, सुरेश चव्हाण यांनी सतरा तारखेपर्यंत मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला. या
चर्चेवेळी जिल्हा परिषद सदस्य महेश चौगुले, विजय यादव, सतिश मुसळे, दिनकर पोवार, अनिल दळवी,सचिन गाताडे,सचिन देशमुख,मोहन काळे,रमेश वाईंगडे,दिपक काळे,दत्ता यादव,सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविस्तार अधिकारी अजितकुमार राणे, तलाठी महेश सूर्यवंशी, पोलीस पाटील स्वप्नील साठे उपस्थित होते. दरम्यान उत्तरीय तपासणीसाठी राज काळे याचा मृतदेह सीपीआर रुग्णालयात नेला होता. हा मृतदेह ठिय्या आंदोलनाच्या ठिकाणी आणण्याची संतप्त आंदोलकांचा निर्णय होता परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निर्णय दिल्याने आंदोलकांनी आपला निर्णय मागे घेतला.
वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. आर. माळगावकर तसेच डॉ. बर्गे यांच्याविरोधात वारंवार निवेदने दिली जातात. त्यांच्याबद्दल तक्रारी केल्या जातात .परंतु आजअखेर त्यांच्यावर कारवाई झाली नाही. डॉ.माळगावकर यातर जवळपास गेल्या आठ वर्षांपासून याच आरोग्य केंद्रात असल्याचे समजते.