नियोजनच्या सभेत परस्परांच्या ‘कुंडल्या’ काढण्यातच गेला जास्त वेळ : ‘अरे’ला ‘कारे’ची सज्जता : शाब्दिक हल्ल्यांवर राहिला भर
- जाणीवपूर्वक डिवचाल, तर हप्ता वसुली बाहेर काढू – राणे
- नारायण राणे यांच्या प्रहारांना प्रतिभा डेअरी प्रकरणाचा प्रतिप्रहार
शेखर सामंत / सिंधुदुर्ग:
स्थानिक विकासावरील चर्चेऐवजी नियोजन समितीच्या बैठकीतील अधिकाधिक वेळ हा एकमेकांच्या कुंडल्या काढण्यातच गेला. मिटिंग आटोपण्याची घाई तर सर्वांनाच होती. परंतु, मिळालेल्या थोडय़ा वेळेतदेखील एकमेकांची ‘उणीधुणी’ काढण्याची कसर कोणीच सोडली नाही. अरे ला… कारे उत्तर देण्याची तयारीही जोरात करण्यात आली होती. परंतु, ‘सुदैवाने’ वेळ अपुरा होता. त्यामुळे नाटय़ रंगता रंगताच पडदा पडला. विकासाच्या नियोजनाची ही सभा नियोजित वेळेत संपवण्यावर दोन्ही बाजूंचा भर राहिला.
खरं सांगायचं तर या बैठकीत नारायण राणेंची उपस्थिती विरोधकांच्या पथ्थ्यावर पडली. सत्ताधाऱयांना कोंडीत पकडायच्या तयारीने विरोधक आले खरे. परंतु राणेंनाच लवकर निघायचे असल्यामुळे त्यांनी विरोधकांना जास्त ताणायची संधी न देता आक्रमणाची धुरा स्वत:च्या ताब्यात ठेवली. या काळात त्यांनी आमदार दीपक केसरकरांना टार्गेट करायची एकही संधी सोडली नाही. ‘आमची कुरापत काढाल, तर ठेकेदारांकडील हप्ता वसुली बाहेर काढेन’ असा थेट इशाराही त्यांनी सत्ताधारी नेत्यांना दिला. पालकमंत्र्यांनी मात्र राणेंच्या वेळेच्या अपरिहार्यतेचा अचूक फायदा उठवत, वेळप्रसंगी स्वत:च्या अध्यक्षीय अधिकारांची आठवण करून देत मोठय़ा आत्मविश्वासाने ही सभा नियोजित वेळेतच पार पाडली.
तब्बल नऊ महिन्यांनी सभा
जिल्हय़ाच्या विकासासाठी अत्यंत महत्वपूर्ण म्हणून ओळखली जाणारी जिल्हा नियोजन समितीची ही सभा कोरोनाच्या अडथळय़ामुळे तब्बल नऊ महिन्यांनी आयोजित करण्यात आली होती. निवडणुका जवळ आल्यामुळे, निधी आणि कामांच्या वाटपावरून ही सभा वादळी होणार, हे निश्चितच होते. यासाठी दोन्ही बाजूंनी जय्यत तयारी करण्यात आली होती. परंतु, या सभेस प्रमुख उपस्थिती असलेले केंद्रीय लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्याकडेच अपुरा वेळ असल्यामुळे कुठलाही मुद्दा अधिक ताणायचा नाही, हे ठरवूनच राणे समर्थक नियोजन सदस्य सभेला उपस्थित होते. तर राणेंच्या प्रहारांना तेवढय़ाच तोडीने प्रतिप्रहार करण्याची तयारी सत्ताधारी सदस्यांनीही ठेवली होती. झालेही तसेच.
सुरुवातीपासूनच राणे आक्रमक, सेना नेत्यांवर केले शाब्दिक प्रहार
राणेंनी सभेच्या सुरुवातीलाच पालकमंत्र्यांच्या अधिकारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत विरोधाचे सुकाणू आपल्या हातात घेतले. ‘डीपीडीसी’त मंजूर झालेली कामे बदलण्याचा अधिकार पालकमंत्र्यांना आहे का, या प्रश्नाचे उत्तर मला लेखी स्वरुपात हवे, असा आग्रह त्यांनी धरला. या दरम्यान सत्ताधारी व विरोधी गटांत जोरदार खडाजंगी झाली. शेवटी पालकमंत्री उदय सामंत यांनी मोठय़ा संयमाने आणि आत्मविश्वासाने राणेंच्या या हल्ल्याला तोंड देत हा विषय संपवला. कोरोना काळात निर्माण झालेल्या अडचणींमुळे दोन्ही बाजूंकडील संमत्तीतूनच ही कामे बदलण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
निधीचे आमिष दाखवून पक्षप्रवेश कायद्याच्या कोणत्या कक्षेत बसतो?
पहिला हल्ला केल्यानंतर राणेंनी वृत्तपत्रातील बातमीचा दाखला देत शासकीय निधीचे आमिष दाखवत पक्षात कार्यकर्त्यांची भरती करून घेणे कोणत्या कायद्याच्या कक्षेत बसते, असा थेट सवाल पालकमंत्र्यांना केला. यावर पालकमंत्री सामंत यांनी आपण तसं बोललोच नाही, असा खुलासा केला. त्यावर भाष्य करताना राणे यांनी शिवसेनेला टीकेचे लक्ष्य करीत नापिक जमिनीत कितीही पेरले, तरी त्यावर काहीही उगवणार नाही, असा टोमणा सत्ताधाऱयांना लगावला.
आपल्या मतदारसंघात वैभव नाईक यांचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही – नीतेश राणे
राणे आक्रमक झाल्यानंतर, या आक्रमणाची धार अधिक वाढवण्यासाठी आमदार नीतेश राणेंही आक्रमक झाले. आपल्या मतदारसंघातील कामे बदलण्यासाठी आमदार वैभव नाईक यांनी दिलेले पत्र आणि पालकमंत्र्यांनी त्या पत्राला दिलेली सहमती याचे दाखले देत एक आमदार दुसऱयाच्या मतदारसंघात अशा प्रकारे हस्तक्षेप करू शकतो का, असा संतप्त सवाल त्यांनी केला. याच मुद्दय़ावरून बाहेर गेटवर लोक आंदोलन करीत असल्याची आठवण त्यांनी यावेळी करून दिली. आपल्या मतदारसंघात यापुढे हस्तक्षेप झाल्यास सर्वांना पळता भुई थोडी करेन, असा संतप्त इशाराच त्यांनी दिला. त्यावर बोलताना पालकमंत्र्यांनी आपण सभा संपताच आंदोलकांना भेटून हा प्रश्न सोडवणार, असे सांगून यावर पडदा टाकला.
सत्ताधाऱयांकडून प्रतिआक्रमण, प्रतिभा डेअरी फसवणूक प्रकरणाला घातला हात
राणे पिता-पुत्र आक्रमक होत असल्याचे पाहताच, त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी ठरल्यानुसार मग सत्ताधारी सदस्यांनीही आक्रमण सुरू करीत प्रतिभा डेअरीच्या थकलेल्या अडीच कोटीच्या प्रकरणालाच हात घातला. जिल्हय़ातील दूध उत्पादक शेतकऱयांच्या थकलेल्या अडीच कोटींना जबाबदार कोण? या जबाबदार नेत्यावर कारवाई झालीच पाहिजे. सदर नेत्याकडून या पैशांची वसुली झालीच पाहिजे, अशी मागणी लावून धरली. फसवणूक झालेले शेतकरी बाहेर गेटवर उपोषणासाठी बसले असल्याची जाणीव त्यांनी करून दिली. नियोजन सदस्य संदेश पारकर यांनी हा प्रश्न लावून धरताच, राणे पिता-पुत्र प्रचंड आक्रमक झाले. शेतकऱयांच्या आर्थिक नुकसान भरपाईची जबाबदारी मी घेतो. मात्र लोकांचे पैसे थकवणाऱयांनी आम्हाला शिकवू नये, असा टोला त्यांनी मारला. या विषयात हस्तक्षेप करीत कोणालाही पाठिशी घातले जाणार नाही, असे पालकमंत्र्यांनी सांगताच, राणे संतप्त झाले. आरोप जरुर करा. परंतु, जाणीवपूर्वक मला डिवचण्याचा प्रयत्न करीत असाल, तर तुमची माणसे निवडणूक निधीसाठी ठेकेदारांकडून हप्ते कसे वसूल करीत आहेत, हे पुराव्यानिधी उघड करून हप्ते देणाऱया ठेकेदारांची लाईनच सभागृहाच्या दारात उभी करेन, अशी थेट धमकीच राणेंनी सत्ताधाऱयांना दिली. यावरून सभागृहात प्रचंड गोंधळ झाला. राणे पिता-पुत्र आणि संदेश पारकर यांच्यात या विषयावरून जोरदार चकमक उडाली. मात्र सभा आटोपती घ्यायची आहे, हे लक्षात येताच हा विषय जास्त न ताणता थांबविण्यात आला.
पुन्हा राणे आणि सत्ताधारी सदस्यांमध्ये चकमक
प्रतिभा डेअरी, हप्ता वसुली, मतदारसंघातील हस्तक्षेप यावरील वादानंतर सत्ताधारी पक्षातील नियोजन सदस्य बाबुराव धुरी यांच्या प्रश्नावरून पुन्हा एकदा सभेत उदेक झाला. यावेळी नारायण राणे आणि बाबुराव धुरी यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक उडाली. ‘तू मला सभेचे नियम शिकवणार आहेस का? तुला कोणी अधिकार दिले?’, असा थेट सवाल करीत राणे यांनी आवाज चढवला. यावेळी नियोजन सदस्या जान्हवी सावंत यांनी धुरी यांना साथ देत तुम्हालाही आम्हा सदस्यांवर दबाव आणण्याचा अधिकार नाही, असे राणेंना निर्देर्शित करीत सांगितले. यावेळी राणे समर्थक विरोधी महिला सदस्य आक्रमक झाल्या. जि. प. अध्यक्षा संजना सावंतदेखील जान्हवी सावंत यांच्या वक्तव्यावर प्रचंड संतापल्या. त्यामुळे सभागृहातील वातावरण खूपच तापले. पण वेळ कमी असल्यामुळे राणे यांनी आपल्या सर्व सदस्यांना शांत केले आणि या विषयावरही पडदा पडला.
आमदार केसरकर यांना केले ‘लक्ष्य’
नियोजनच्या व्यासपीठावर खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक आदी राजकीय विरोधक उपस्थित असताना राणे यांनी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या आमदार दीपक केसरकर यांनाच ‘टार्गेट’ करण्याची एकही संधी सोडली नाही. केसरकरांच्या प्रत्येक वक्तव्यावर राणे त्यांच्यावर प्रहार करण्याचा, त्यांची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न करीत होते. ‘याला काय समजतं?’ ‘हा अध्यक्ष आहे का?’ अशा एकेरी भाषेत ते सतत केसरकरांवर हल्ला करीत होते. परंतु, केसरकरही तेवढय़ाच तडफेने राणेंना प्रत्युत्तर देत होते. या सभेत राणेंनी खासदार राऊत, आमदार नाईक व पालकमंत्री सामंत यांच्यावर फारसे शाब्दिक हल्ले केले नाहीत. सत्ताधारी पक्षाच्यावतीने संदेश पारकर, बाबुराव धुरी, संजय पडते आणि जान्हवी सावंत या सदस्यांनी जोरदार हल्ले केले. तर विरोधी पक्षाच्यावतीने उपाध्यक्ष रणजित देसाई, सभापती अंकुश जाधव व दादा कुबल या सदस्यांनी आक्रमणाची बाजू सांभाळली. जि. प. अध्यक्षा संजना सावंत यांनी देखील काहीशी आक्रमकता दाखवली. खासदार राऊत, आमदार नाईक मात्र काहीसे शांतच होते.
पालकमंत्र्यांची परिपक्वता
या सभेमध्ये वादग्रस्त प्रश्नांवर पडदा कसा टाकायचा, विषय कसा ताणायचा नाही आणि मिळालेल्या संधीचा अचूक फायदा कसा उठवायचा, याचे उत्तम दर्शन पालकमंत्री उदय सामंत यांनी या सभेत दाखवले. नियोजित कार्यक्रमांमुळे राणेंना ही बैठक लवकर आटोपती घ्यायची आहे, हे माहीत असल्याने कुठलाही विषय अधिक ताणला जाणार नाही, हे त्यांना माहीत होते. हिच संधी साधत त्यांनी मोठय़ा कल्पकतेने आणि आत्मविश्वासाने ही सभा नियोजित वेळेत पार पाडली. विरोधकांना वरचढ होण्याची संधीच त्यांनी दिली नाही. राणेंना पुढील कार्यक्रमांना जायचे असल्यामुळे समर्थक सदस्यांच्या आक्रमणाला मर्यादा आल्या. आमदार राणे यांचीही तिच अवस्था झाली. वेळ कमी असल्यामुळे सत्ताधाऱयांना धारेवर धरण्याची फारशी संधी त्यांना मिळाली नाही. त्यामुळे विकासकामांवर फार चर्चा न होताच ही सभा पार पडली. या सभेस उपस्थित असलेले पाहुणे आमदार तटकरे व आमदार बाळाराम पाटील यांनी या सभेत शांत राहणेच पसंत केले.