नवीन वर्ष आले आहे ते नवीन आव्हानांना घेऊन. सत्ताधारी भाजप तसेच त्याच्या विरोधकांचे येत्या वर्षातील सगळय़ात मोठे आव्हान म्हणजे उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुका होत. या एक दोन आठवडय़ात निवडणुकीची घोषणा अपेक्षित आहे. उत्तर प्रदेशात जो कोणी विजय पताका झळकवेल तो पुढील लोकसभा निवडणुकीत आपला प्रभाव पाडेल हे स्पष्ट असल्याने देशातील या सगळय़ात मोठय़ा राज्यातील निवडणुकीत काटय़ाची टक्कर दिसणार आहे.
शिवसेनेचा प्राण जसा लवकरच निवडणुका होत असलेल्या बृहन्मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशनमध्ये आहे, तद्वतच भाजपचा जीव हा उत्तर प्रदेशमध्ये सत्ता राखण्यामध्ये आहे. त्यामुळेच लखनौवरील आपली मांड पक्की ठेवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आपले सर्वस्व पणाला लावत आहेत. परिकथेतील गोष्टीत राजाचा प्राण जसा शाही पिंजऱयातील पोपटात असायचा, तद्वतच सत्ताधारी भाजपचा जीव हा लखनौमधील सत्तेत आहे असे म्हणणे वावगे होणार नाही. एकदा का उत्तर प्रदेशमधील सत्ता गेली तर भाजपचा डोलारा कोसळायला वेळ लागणार नाही अशी खरीखोटी समज राजकीय वर्तुळात आहे. याचा अर्थ उत्तर प्रदेशमधील भाजप म्हणजे ‘पाप्याची पितर’ झाली अशातला भाग नव्हे पण पाच वर्षाच्या योगी सरकारच्या कामगिरीवर आपल्याला सहजासहजी सत्ता राखता येणार नाही याची बोचरी जाणीव भाजपात निवडणूक जवळ येत आहे तशी वाढत आहे.
उत्तर प्रदेशमध्ये विरोधी पक्षांचे सरकार कदाचित येऊ शकते या कल्पनेनेच भाजपाई हादरून गेले आहेत. पंतप्रधानांच्या वाढत्या उत्तरप्रदेश दौऱयातून ही भीती झळकत आहे. हरिद्वारमधील वादग्रस्त धर्मसंसद आणि त्यातील मुस्लिम समाजाविरोधी झालेली भडकाऊ भाषणे म्हणजे हिंदू मतपेढीला पुन्हा बाळसे आणण्याचे काम. ख्रिस्ती समाजाविरुद्ध विविध ठिकाणी सुरु झालेले ‘कार्यक्रम’ देखील ध्रुवीकरणाच्या दिशेनेच आहेत हे समजायला राजकीय पांडित्याची जरुरी नाही. मदर तेरेसांच्या ‘मिशनरीज ऑफ चॅरिटी’ ने काही गैरव्यवहार केले असे गृहीत धरले तरी त्यांच्या परदेशी देणग्या या क्रिसमसलाच थांबवण्यात आल्या हा केवळ योगायोग वाटत नाही. अल्पसंख्याकांचा कत्लेआम करण्याच्या गर्जना हरिद्वारला झाल्या तरी संबंधितांवर सरकारकडून अजून काहीच कार्यवाही झाली नाही. जो संदेश जायचा तो गेलेला आहे. अशा प्रकारचे आग लावण्याचे काम देशाच्या ऐक्मयाला बाधक ठरेल असे समाजातील एक वर्ग पोटतिडिकीने सांगत असूनही ध्रुवीकरणाचा खेळ अजिबात कमी झालेला नाही.
ध्रुवीकरणाचा प्रचंड घाट घालूनदेखील शंका आहेतच. डिसेंबर 6, 1992 ला बाबरी मशीद पडल्यानंतर झालेल्या निवडणुकात भाजपला बहुमत मिळू शकले नव्हते तर आता भव्य राम मंदिराचा पायाभरणी समारंभ झाल्यावर त्याला परत सरकार स्थापन करता येणार का या मुद्यावर वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. उत्तर प्रदेशमधील राजकीय वारे नेहमी बदलत राहिल्याने गेल्या वीस वर्षात कोणताही एक पक्ष राज्यात दुसऱयांदा विजयी झालेला नाही हे वास्तवदेखील विसरता येत नाही. असे असले तरी गेली सात वर्षे उत्तर प्रदेशमध्ये मोदींचा जलवा दिसत असल्याने ती खचितच भाजपची जमेची बाजू आहे. या काळात दोन लोकसभा आणि एक विधानसभा निवडणुका मोदींच्या नेतृत्वाखाली सत्ताधारी पक्षाने दिमाखाने जिंकल्या आहेत. भाजपने आपल्या विरोधकांचा या निवडणुकांत पालापाचोळा केला आहे.
पण जर का विधानसभा निवडणुकात स्थानिक मुद्दे पुढे आले तर भाजपचे बारा वाजल्याशिवाय राहणार नाहीत. योगी आदित्यनाथ यांनी जाहिरातींवर प्रचंड खर्च करून बऱयाच प्रसारमाध्यमांना मिंधे करून टाकले आहे. या जाहिरातींमधील दावे खरे मानले तर भाजप अलगदपणे परत सत्तेत येणार. वास्तव वेगळे आहे. गेल्याच आठवडय़ात आलेल्या नीती आयोगाच्या एका पहाणीनुसार आरोग्यसेवेच्या बाबतीत उत्तर प्रदेश हे देशातील सर्वात मागासलेले राज्य आहे. प्रसारमाध्यमे सत्ताधारी मंडळींनीच बहुतांशी टीमकी वाजवत असल्याने जमिनीवरील परिस्थिती फारशी पुढे येत नाही. अखिलेश यादव यांच्या सभांना होत असलेली अमाप गर्दी एक वेगळीच कहाणी सांगत आहे. प्रियंका गांधींनी देखील राज्य ढवळून काढले आहे आणि महिलावर्गाची एक नवी मतपेढी बनवण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत. समाजवादी पक्षाने बऱयाच लहान पक्षांबरोबर निवडणूक समझोते करून भाजपसमोर तगडा मुकाबला उभा केला आहे.
भाजपचा एक फायदा म्हणजे त्याच्याकडे प्रचार करण्यासाठी केंद्र आणि राज्यातील नेत्यांची मोठी फळी आहे. पंतप्रधान तसेच गृहमंत्री अमित शहा, पक्षाध्यक्ष जे पी नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचे दौरे अव्याहतपणे सुरु आहेत. उत्तर प्रदेशात ‘डबल इंजिन’ चे सरकार असल्याने फीत कापण्याच्या तसेच पायाभरणी समारंभांना जणू ऊत आला आहे. धरतीवर स्वर्ग कुठं असेल तर तो उत्तर प्रदेशात असे या कार्यक्रमातून भासवले जात आहे. याउलट विरोधी पक्षांची मोहीम ही केवळ मूठभर नेते चालवत असल्याने तेवीस कोटी लोकसंख्या असलेल्या उत्तरप्रदेशात ते आपला संदेश प्रभावीपणे शेवटच्या माणसापर्यंत पोहोचू शकतील कि नाही याबाबत शंकेला जागा आहे. भाजपकडे साधनांची जबर रेलचेल आहे. त्याकडे इंद्राचा ऐरावत आहे. त्याच्यासमोर विरोधी पक्ष म्हणजे श्यामभटाची तट्टाणी आहे.
गेल्या वषी झालेल्या बंगालच्या निवडणुकात असेच चित्र होते. ममता बॅनर्जीना पदभ्रष्ट करण्यासाठी मोदी-शहा यांनी सर्वस्व पणाला लावले होते. पण त्या भाजपच्या नाकावर टिच्चून तिसऱयांदा मुख्यमंत्री झाल्या होत्या. उत्तर प्रदेशात अखिलेश यादव यांनी भाजपला घाम फोडला आहे. प्रियंका गांधी देखील पदर खोचून कामाला लागल्या आहेत. मायावती मात्र फारशी हालचाल करताना दिसत नाहीत पण त्यांची दलित मतपेढी पूर्णपणे खिसकली आहे असे मानणे शहाणपणाचे ठरणार नाही. बसप हळूहळु संपत चालला आहे ही भावना कितपत बरोबर अथवा चूक हे या निवडणुकीत दिसणार आहे. कोणाला आवडो अथवा नावडो, जहाल हिंदुत्वाचे भाजपचे कार्ड मागास उत्तर प्रदेशात परत यशस्वी झाले तर मोदींचा जलवा राष्ट्रीय राजकारणात देखील कायम राहणार आहे. उत्तर प्रदेशमध्ये भाजपचा चेहरा मोदीच झालेले आहेत हे विसरून चालणार नाही.
सुनील गाताडे