अनेक दिवसापासून विकासापासून वंचित : रस्त्यांची दुर्दशा, पथदीप बंद अवस्थेत
प्रतिनिधी / बेळगाव
शहरात स्मार्ट सिटी योजनेंतर्गत विकासकामे करण्यात येत आहेत. मात्र, शहराचा उपनगरी भाग विकासापासून वंचित राहिल्याचे पाहायला मिळत आहे. येथील औद्योगिक वसाहत म्हणून ओळखल्या जाणाऱया उद्यमबाग परिसरात रस्त्यांची वाताहत झाल्याने कामानिमित्त येणाऱया नागरिकांना या परिसरातून जाताना कसरत करावी लागत आहे. पथदीपसुद्धा बंद अवस्थेत असल्याचे पहायला मिळत आहेत. त्यामुळे उद्यमबाग परिसराला वाली कोण, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
येथील उद्यमबागमधील वेगा हेल्मेट कंपनीपासून मोडेकर कंपाऊंड श्री सिद्धनाथ हायड्रोलिक ते ज्ञान प्रबोधन शाळेपर्यंतचा रस्ता खराब झाल्याने येथून ये-जा करणाऱया विद्यार्थी, पालकवर्ग आणि नागरिकांना समस्या निर्माण झाली आहे. येथील रस्ता गेल्या कित्येक वर्षांपासून विकासापासून वंचित राहिल्यामुळे या मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. परिणामी वाहनधारकांना या खड्डय़ांतून मार्ग काढणे मुश्कील झाले आहे.
या भागात डांबरी रस्ता नसल्याने उन्हाळय़ात धुळीचे साम्राज्य, तर पावसात चिखलाचे साम्राज्य या मार्गावर पहायला मिळते. अशा परिस्थितीतूनच नागरिकांना या मार्गावरून ये-जा करावी लागत आहे. त्यातच येथील पथदीपसुद्धा बंद असल्याने रात्री अंधारातून वाहनधारकांना आणि नागरिकांना जावे लागत आहे. शहर स्मार्ट करण्यात येत आहे. पण शहराचा उपनगरी भाग विकासापासून का वंचित राहिला आहे, असा प्रश्न येथील कामगार आणि नागरिक विचारत आहेत. त्यामुळे संबंधित प्रशासनाने याचे गांभीर्य लक्षात घेऊन येथील समस्यांचे त्वरित निवारण करावे, अशी मागणी होत आहे.