नानावाडी परिसरातील उद्यानांचा विद्युतपुरवठा बंद असल्याने अंधाराच्या विळख्यात
प्रतिनिधी /बेळगाव
शहरात विविध ठिकाणी उद्याने निर्माण करण्यात आली आहेत. मात्र बहुतांश उद्यानांमध्ये नागरी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या नसल्याने शहरवासियांची गैरसोय होत आहे. नानावाडी परिसरातील उद्यानांचा विद्युतपुरवठा बंद असल्याने संपूर्ण उद्यान अंधाराच्या विळख्यात सापडले आहे. यामुळे या उद्यानात गैरप्रकारांना ऊत आल्याच्या तक्रारी नागरिक करीत आहेत.
शहर व उपनगरात महापालिका आणि बुडाच्या कार्यक्षेत्रात उद्याने निर्माण करण्यात आली आहेत. उद्यानांच्या विकासासाठी कोटीचा निधी खर्च केला जातो. अलीकडे स्मार्ट सिटी योजनेंतर्गतदेखील काही उद्यानांचा विकास करण्यात आला आहे. मात्र उद्यानांच्या विकासाचे काम पूर्ण झाल्यानंतर देखभालीकडे कानाडोळा केला जात आहे. यामुळे उद्यानांची दुरवस्था होत आहे. काही उद्यानांमध्ये नागरी सुविधादेखील उपलब्ध केल्या जात नसल्याचे निदर्शनास आले आहे. काही उद्यानांमध्ये झाडांसाठी पाणी नाही तर बऱयाच ठिकाणी गवत व झाडेझुडपे वाढली आहेत. त्यामुळे उद्यानांचा विकास करण्यामागचे प्रयोजन काय? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे.
काही उद्यानांमध्ये डेकोरेटिव्ह पथदीप बसविण्यात आले आहेत. तसेच नागरिकांसाठी आसन सुविधा व वॉकिंगसाठी पेव्हर्स घालून ट्रक तयार करण्यात आले आहेत. पण या उद्यानातील दिवे बंद झाल्याने अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे. काही उद्यानांना तारेचे कुंपन व संरक्षक भिंत बांधून सुरक्षित करण्यात आले आहे. मात्र काही ठिकाणी तारेचे कुंपन नसल्याने उद्यानांची दुरवस्था झाली आहे. उद्यानातील दिवे बंद असलेल्या ठिकाणी गैरप्रकार चालत आहेत. नानावाडी परिसरात उद्यानांचा विकास करण्यात आला आहे. पण उद्यानातील दिवे बंद असल्याने हे उद्यान अंधाराच्या विळख्यात सापडले आहे. उद्यानातील दिवे सुरू करण्यात यावेत, याकरिता महापालिकेकडे अनेकवेळा तक्रारी केल्या आहेत. पण दिवे सुरू करण्यात आले नाहीत. रस्त्याशेजारी असलेल्या पथदीपांचा उजेड उद्यानात पडत आहे. पण दुसऱया बाजूला पूर्णपणे अंधार निर्माण होत आहे. विद्युतपुरवठा बंद असल्याने या ठिकाणी गैरप्रकार चालत आहे. या ठिकाणी येणाऱया तरुण-तरुणींच्या गैरप्रकारांमुळे परिसरातील रहिवासीदेखील हैराण झाले आहेत. त्यामुळे या उद्यानातील पथदीप सुरू करण्यात यावेत, अशी मागणी होत आहे.