संजीवनी हॉस्पिटलमधील प्रकार, :नातेवाईकांचा आरोप, डॉक्टर व नर्स नसल्यामुळेच रुग्ण दगावला,नावाला स्पेशालिटी हॉस्पिटल आत भोंगळ कारभार
प्रतिनिधी /गोडोली
वडिलांची उत्तम तब्येत असल्याचे डॉक्टरांनी काल सांगितले होते मात्र रात्रभर उपचाराची हेळसांड झाल्याने माझ्या वडिलांचा मृत्यू झाला. आयसीयूमधील रूग्णांकडे लक्ष देण्यासाठी पूर्णवेळ डॉक्टर व नर्स नसल्याने रूग्णाच्या उपचाराकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळेच वडिलांचा मृत्यू झाल्याचा आरोप मृत रुग्णाचा मुलगा ओमकार बोधे यांनी केला आहे. तसेच बेजबाबदारपणे वागणाऱया संजीवनी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ‘देवमाणसा’च्या प्रवृत्तीच्या असणाऱया स्टाफवर विश्वस्तांनी संबंधित दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा. तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी मागणी ओमकार बोधे आणि कुटुंबीयांनी संजीवनी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या प्रशासनाकडे लेखी तक्रार अर्जाद्वारे केली असल्याचे ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले.
साताऱयातील सदरबझार येथील संजीवनी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे सात दिवसापुर्वी डॉ. कौस्तुब पाटील यांनी एका रूग्णाला दाखल करण्यास नातेवाईकांना सांगितले. या रूग्णाला उपचारासाठी आयसीयू वॉर्डमध्ये ऍडमिट केल्यापासून योग्य उपचारापेक्षा हेळसांड जास्त झाली. सदरचा रूग्ण गुरूवारी रात्री छान सेटेल झाला असल्याचे डॉ. कौस्तुभ पाटील यांनी नातेवाईकांना सांगितले. मात्र गुरूवारी रात्री आयसीयू वॉर्डचे इंचार्ज डॉक्टर आणि नर्स यांनी वॉर्डमध्ये न थांबता झोपायले गेले. रूग्णांला त्रास होत असल्याचे वारंवार नातेवाईकांनी सतत व्यवस्थापनाच्या निदर्शनास आणून दिले. तक्रार केली की यायचे, पहायचे आणि रूग्णाला आता काही त्रास नाही, असे सांगून नाईट डय़ुटी करणारे झोपायला जात होते, असा आरोप रूग्णाचा मुलगा ओमकार बोधे यांने ‘तरुण भारत’ शी बोलताना सांगितले.
याबाबत हॉस्पिटलच्या व्यवस्थापनास विचारले असता, आयसीयू वॉर्डमध्ये पूर्णवेळ डॉक्टर आणि दोन नर्स असल्या पाहिजेत. मात्र गुरुवारी रात्री काय घडले यांची अजून खातरजमा केली नाही. चौकशीअंती दोषीवर कारवाई करू, असे मोघम उत्तरे दिली. मात्र हॉस्पिटलचे विश्वस्त असणारे काही जण व्यवस्थापकाकडून सतत माहिती घेत त्यांनाच प्रकरण हाताळायला लावत होते. सीसीटीव्ही फुटेजमध्ये डॉक्टर आणि नर्स रात्रभर वॉर्डमध्ये की गायब असल्याचे सत्य समोर येईल, ते प्रसार माध्यमांना दाखवा, अशी रूग्णांच्या नातेवाईकांनी मागणी केली. मात्र विश्वस्तांची परवानगी नसल्याचे सांगितले गेले.
दरपत्रक झाले गायब
सामाजिक कार्यकर्ते रविंद्र कांबळे यांनी शहरातील सर्व रूग्णालयांनी उपचाराचे दरपत्रक लावावे, या मागणीसाठी आंदोलने ते थेट मंत्रालयापर्यंत प्रयत्न केले. तेव्हा प्रसिध्दीची हाव असलेल्या संजीवनी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या विश्वस्तांनी सर्वात आधी दरपत्रक लावले. फक्त प्रसिध्दीसाठी लावलेले दरपत्रकाबाबत विचारणा केली असता, याबाबत माहिती नसल्याचे व्यवस्थापक स्टाफने सांगितले. रूग्णांच्या मजबुरीचा पुरेपुर गैरफायदा घेण्यासाठी व्यवस्थापक पदावर आत्तापर्यंत अनेकांनी अनुभव घेतला. वैद्यकिय सेवेच्या आडून रूग्णांच्यावर उपचारापेक्षा लुटालुट करण्यात विश्वस्त माहिर असल्याचे काही नातेवाईकांनी यावेळी बोलताना आरोप केले.
त्या ‘देवमाणसा’वर गुन्हा दाखल करावा
गुरूवारी रात्रभर रूग्णांच्या उपचारात हेळसांड करणारा नाईटला असलेला डॉक्टर परळी आणि साताऱयात ओपीडी पाहतो. तर जिल्हा रूग्णालयाच्या समोर असलेल्या एका हॉस्पिटलमध्येही सभासद असून तिथेही रूग्णसेवा करतो. एकाच वेळी चार ठिकाणी व्यस्त असलेल्या या ‘देवमाणसा’मुळे आमचा रूग्ण दगावला. त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी नातेवाईकांच्या मागणीने संजिवनीचे विश्वस्त गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतील, अशी बोधे कुटूबीयांनी अपेक्षा व्यक्त केली आहे.
विश्वस्त मागच्या दाराने आत
घटनेच्या दरम्यान हॉस्पिटलेचे विश्वस्त असलेले काही जण प्रसारमाध्यमांना पाहून मागच्या दाराने वरच्या मजल्यावर गेले. तेथून अपडेटस घेत राहिले. मात्र मृत्यू पावलेल्या रूग्णांच्या नातेवाईकांना भेटून आधार देण्याची कृतज्ञता दाखवावी, असे त्यांना वाटले नाही. संजीवनी स्पेशालिटी हॉस्पिटल प्रत्येक विश्वस्ताचे स्वतंत्र हॉस्पिटल असून अनेक ठिकाणी व्हिजिटर म्हणून ही मंडळी जात असून हे हॉस्पिटल साईट बिजनेस म्हणून असल्याने त्यांचे येथे लक्ष नसल्याचे यावेळी काही रूग्णांच्या नातेवाईकांनी आरोप केला.