पोटरीच्या दुखापतीचा फटका, युवा गोलंदाज शार्दुल ठाकुरला संधी मिळण्याची दाट शक्यता
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
मध्यमगती गोलंदाज उमेश यादव ऑस्ट्रेलियाविरुद्ध सध्या सुरु असलेल्या कसोटी मालिकेतून बाहेर फेकला गेला असल्याचे गुरुवारी स्पष्ट झाले. पोटरीच्या दुखापतीमुळे तो मालिकेतील उर्वरित सामन्यांत खेळू शकणार नाही. भारतीय संघव्यवस्थापन आता सनसनाटी डावखुरा गोलंदाज टी. नटराजनऐवजी शार्दुल ठाकुरला प्रथम पसंती देईल, असे संकेत यावेळी देण्यात आले. उभय संघातील तिसरी कसोटी 7 जानेवारीपासून सिडनीत खेळवली जाणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उमेश यादव दुखापतीतून सावरण्याच्या मोहिमेला लागणार असून यासाठी तो तातडीने मायदेशी रवाना झाला आहे. ‘टी. नटराजननने लक्षवेधी प्रगती दर्शवली असली तरी आतापर्यंत त्याने केवळ एकच प्रथमश्रेणी सामना खेळला, हे विसरुन चालणार नाही’, असे एका सूत्राने गोपनियतेच्या अटीवर नमूद केले. एकीकडे, टी. नटराजनने केवळ एकच प्रथमश्रेणी सामना खेळलेला असताना दुसरीकडे, शार्दुल ठाकुरने मुंबईतर्फे प्रथमश्रेणी क्रिकेटचे अनेक हंगाम गाजवले आहेत. त्यामुळे, त्याला संधी मिळण्याची शक्यता अधिक मानली जाते.
‘यापूर्वी विंडीजविरुद्धच्या लढतीत पदार्पणाची संधी असताना शार्दुलला दुखापत झाल्याने तो एक षटकही टाकू शकला नाही आणि तो अर्थातच कमनशिबी ठरला होता. पण, आता तो पुन्हा एकदा बहरात परतला आहे आणि अंतिम संघात तो उमेश यादवची जागा घेऊ शकेल’, असे या सूत्राने नमूद केले आहे. याबाबतचा अंतिम निर्णय मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, हंगामी कर्णधार अजिंक्य रहाणे व गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण हे सिडनीत पोहोचल्यानंतर घेतील, असे संकेत आहेत.
शार्दुल ठाकुरने आतापर्यंत 62 प्रथमश्रेणी क्रिकेट सामने खेळले असून त्यात त्याने 206 बळी घेतले आहेत. तिसऱया कसोटी सामन्याच्या पार्श्वभूमीवर, भारतीय संघाला आणखी एका समस्येवर मात करावी लागणार असून यात प्रतिस्पर्ध्यांची शेपटी अधिक वळवळणार नाही, याची नखशिखान्त काळजी घ्यावी लागणार आहे.
‘सरावाची पुढील काही सत्रे अतिशय महत्त्वाची ठरणार आहेत आणि त्याचमुळे संघनिवडीचे सर्व निर्णय सिडनीतच घेतले जाणार आहेत’, असे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. तूर्तास, उमेश यादव थेट बेंगळुरातील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीकडे रवाना होणार असल्याचे संकेत आहेत. 33 वर्षीय उमेश यादवला बॉक्ंिसग डे कसोटी सामन्याच्या तिसऱया दिवशी दुखापत झाल्याने मैदान सोडावे लागले होते.
एमसीजीवर रोहित शर्माचा कसून सराव
मेलबर्न : 14 दिवसांच्या सक्तीच्या क्वारन्टाईननंतर भारतीय संघात दाखल झालेल्या रोहित शर्माने 24 तासाच्या आतच आपल्या पहिल्या सराव सत्रात सहभाग घेतला. फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांच्या देखरेखीखाली रोहितने सराव केला. स्टार सलामीवीर म्हणून जागतिक क्रिकेटमध्ये विशेष नावलौकिक प्राप्त केलेल्या रोहितचा तिसऱया कसोटी सामन्यातील सहभाग जवळपास निश्चित मानला जातो.
‘इंजिन आता सुरु झाले आहे आणि सिडनीत तिसऱया कसोटीत प्रतिस्पर्ध्यांसमोर काय आव्हान असेल, ते आता दिसू लागले आहे’, असे ट्वीट बीसीसीआयने केले. त्यांनी येथे रोहित शर्मा सराव करत असल्याची छायाचित्रेही पोस्ट केली. रोहितने गुरुवारी कसून सराव केला. याचवेळी भारतीय संघातील अन्य खेळाडूंनी मात्र एमसीजीवरील दुसऱया कसोटी सामन्यातील विजयानंतर दोन दिवसांचा ब्रेक घेतला.
33 वर्षीय मुंबईकर रोहितला मर्यादित षटकांची क्रिकेट मालिका तसेच पहिल्या दोन कसोटी सामन्यात दुखापतीमुळे खेळता आले नव्हते. आयपीएल स्पर्धेदरम्यान झालेल्या दुखापतीचा त्याला फटका बसला होता.
रोहितने गुरुवारी प्रामुख्याने झेल घेण्याचा सराव केला. रघू या नावाने ओळखला जाणारा थ्रो डाऊन स्पेशालिस्ट रघुनाथ, श्रीलंकेचा नुवान सेनेविरत्ने व दयानंदा गिरानी यांनी रोहितला हा सराव दिला. आपल्या संघसहकाऱयांची भेट घेण्यापूर्वी रोहित दोन आठवडे सिडनीतच क्वारन्टाईन होता. तिसऱया कसोटी सामन्यासाठी संघात रोहितचा समावेश करण्यापूर्वी बीसीसीआयचे वैद्यकीय पथक रोहितशी संवाद साधतील, असे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्राr यांनी यापूर्वी सांगितले होते.
दि. 11 डिसेंबर रोजी रोहितने बेंगळुरातील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये फिटनेस चाचणी पार केली असल्याचे नंतर घोषित केले गेले. त्यानंतर 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाला रवाना होण्याचा मार्ग रोहितसाठी खुला झाला. आता दि. 4 जानेवारी रोजी रोहित संघसहकाऱयांसमवेतच सिडनीकडे रवाना होण्याची शक्यता आहे. रोहित उपलब्ध झाल्याने आता संघात नेमके कसे बदल होणार, त्याचीही उत्सुकता असणार आहे. रोहित सलामीला खेळणार असेल तर मयांक अगरवालला व रोहित मध्यफळीत खेळणार असेल तर हनुमा विहारीला संघातून बाहेर व्हावे लागेल, असे सध्याचे संकेत आहेत. माजी सलामीवीर, ज्येष्ठ समालोचक सुनील गावसकर यांनी सिडनी कसोटीत रोहित शर्मा व शुभमन गिल यांना सलामीला पाठवावे, अशी सूचना केली आहे.
वॉर्नर पूर्ण तंदुरुस्त नसेल तरी ऑस्ट्रेलिया त्याला खेळवणार?
मेलबर्न : दुसऱया कसोटी सामन्यात नामुष्कीजनक पराभव स्वीकारावा लागल्यानंतर झगडणाऱया ऑस्ट्रेलियाचा आता तिसऱया कसोटीत डेव्हिड वॉर्नरला कोणत्याही परिस्थितीत खेळवण्याचा प्रयत्न असणार आहे. वॉर्नर 100 टक्के तंदुरुस्त नसेल तरी चालेल. पण, तरीही त्याला खेळवणारच, असा आपला अट्टहास असल्याचे दस्तुरखुद्द ऑस्ट्रेलियन संघाचे साहायक प्रशिक्षक ऍन्ड्रय़ू मॅकडोनाल्ड यांनीच स्पष्ट केले आहे. धोंडशिरेच्या दुखापतीतून सावरत असलेल्या वॉर्नरच्या गैरहजेरीचा ऑस्ट्रेलियाला मोठा फटका बसला आहे.
‘वॉर्नर किती तंदुरुस्त आहे किंवा नाही, याची सध्या आम्हाला कल्पना नाही. तो बाहेर आल्यानंतरच त्याबद्दल काही सांगता येईल. पण, तो 100 टक्केच तंदुरुस्त असावा, असा आमचा आग्रह अजिबात नाही. तो अगदी 90-95 टक्के तंदुरुस्त असेल आणि मैदानात उतरुन संघाची जबाबदारी शिरावर घेऊ शकत असेल तर आम्ही त्याला निश्चितपणाने खेळवू’, असे मॅकडोनाल्ड आभासी पत्रकार परिषदेत म्हणाले.
सिडनीत खेळवल्या जाणाऱया तिसऱया कसोटी सामन्यात वॉर्नर व पुकोवस्की यांनी सलामीला फलंदाजीला उतरावे, असा यजमान संघाचा सध्याचा प्रयत्न आहे. स्वतः वॉर्नर पुनरागमनासाठी उत्सुक असेल, असा विश्वास मॅकडोनाल्ड यांनी याप्रसंगी व्यक्त केला.
यजमानांना स्टीव्ह स्मिथच्या खराब फॉर्मची चिंता
मेलबर्न : या कसोटी मालिकेत यजमान ऑस्ट्रेलियन संघाला स्टीव्ह स्मिथच्या खराब फॉर्मची देखील बरीच चिंता सतावत राहिली आहे. ऑस्ट्रेलियन फलंदाजीचा भक्कम आधारस्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱया स्टीव्ह स्मिथला भारताविरुद्ध येथे सातत्याने झगडत रहावे लागले आहे आणि याचा अर्थातच यजमान संघाला मोठा फटका बसत आला आहे. स्मिथला पहिल्या दोन कसोटी सामन्यातील 4 डावात केवळ 10 धावाच जमवता आल्या आहेत.
बायो-बबलचा स्मिथवर विपरित परिणाम होत आहे का, या प्रश्नावर सहायक प्रशिक्षक मॅकडोनाल्ड यांनी नकारार्थी उत्तर दिले. ‘आम्ही संयुक्त अरब अमिरातीत राजस्थान रॉयल्सच्या संघव्यवस्थापनाशी सातत्याने संपर्कात होतो आणि स्मिथवर बायो-बबलचा काही परिणाम झाला असेल, असे सकृतदर्शनी दिसून आलेले नाही. आता ख्रिसमसदरम्यान सर्वच खेळाडू आपल्या कुटुंबियांसमवेत नव्हते आणि यात काही करण्यासारखे देखील नव्हते’, असे मॅकडोनाल्ड तपशीलवार बोलताना म्हणाले.
ऍडलेड व मेलबर्नमधील दोन्ही लढतीत एकही अर्धशतक झळकावू न शकलेल्या मार्नस लाबुशानेबद्दलही मॅकडोनाल्ड यांनी असेच मत नोंदवले. आपल्या खेळाडूंनी तंत्रशुद्ध खेळावर भर दिला तरी ते पुरेसे असेल, असे ते याप्रसंगी म्हणाले. एमसीजीवर जो टर्न व बाऊन्स होता, तो आमच्यासाठी देखील आश्चर्याचा होता, असे त्यांनी शेवटी नमूद केले.