मंत्री एस. सुरेशकुमार यांची माहिती : मंगळवारी विविध खात्यांच्या वरिष्ठ अधिकाऱयांची बैठक होणार
प्रतिनिधी / बेंगळूर
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग नियमितपणे सुरू करण्यात आले आहेत. तर सहावी ते आठवीपर्यंतचे वर्ग विद्यागम पद्धतीअंतर्गत दिवसाआड भरविले जात आहेत. त्यामुळे पाचवीपर्यंतचे वर्ग केव्हापासून सुरू करावेत, याबाबत निर्णय घेण्यासाठी 16 फेब्रुवारी रोजी बैठक घेण्यात येईल, अशी माहिती प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणमंत्री एस. सुरेशकुमार यांनी दिली.
बेंगळूर येथे शुक्रवारी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण खात्यातील अधिकाऱयांची बैठक घेतल्यानंतर ते बोलत होते. राज्यातील सर्व भागातून उर्वरित वर्गही नियमितपणे सुरू करण्याची मागणी केली जात आहे. पालक, विद्यार्थ्यांकडूनही दबाव येत असल्याने 16 फेब्रुवारी रोजी पुन्हा बैठक घेण्यात येईल. आरोग्य खाते-वैद्यकीय शिक्षणमंत्री आणि कोविड तांत्रिक सल्लागार समितीशी चर्चा करून ठोस निर्णय घेण्यात येईल, असे सुरेशकुमार यांनी स्पष्ट केले.
सध्या सुरू असणाऱया वर्गांच्या हजेरीचा आढावा घेण्यात आला आहे. आपण अलिकडेच 15 जिल्हय़ांतील अनेक शाळांना भेटी देऊन तेथे कोविड मार्गसूचीचे पालन होत आहे का?, याची पाहणी केली आहे. शाळा विलंबाने सुरू झाल्यामुळे विद्यार्थी शाळेकडे येण्यास उत्सुक आहेत. शिवाय ते अभ्यासाच्या बाबतीतही दक्ष झाले असल्याचे आपल्या निदर्शनास आले आहे, अशी माहिती सुरेशकुमार यांनी दिली.
गटशिक्षणाधिकारी कार्यालये आणि जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयात कामे योग्य पद्धतीने आणि योग्य वेळेत होत नसल्याच्या अनेक तक्रारी आपल्याजवळ आल्या आहेत. सातत्याने नागरिकांकडून तक्रारी येत असल्याने प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी विशेष कार्यवाही सुरु करण्याची सूचना आपण अधिकाऱयांना दिल्याचे ते म्हणाले.
धारवाडमध्ये 1 मार्च रोजी अदालत
येत्या 1 मार्च रोजी धारवाड अप्पर आयुक्तालय विभागात फाईलींची कामे मार्गी लावण्यासाठी आपल्या नेतृत्वाखाली अदालत सुरू करण्यात येईल. याच धर्तीवर उर्वरित आयुक्तालयांनी देखील कार्यवाही करावी, अशी सूचना त्यांनी शिक्षण खात्यातील वरिष्ठ अधिकाऱयांना दिली आहे.
विद्यार्थ्यांची हजेरी वाढली सध्या नियमितपणे सुरू झालेल्या नववी ते बारावीपर्यंतच्या वर्गांमधील हजर विद्यार्थ्यांची संख्या व सहावी ते आठवीपर्यंतच्या विद्यागम वर्गासाठी हजर होणाऱया विद्यार्थ्यांची माहिती घेण्यात येत आहे. शिवाय शाळांकडून कोविड मार्गसूचीचे पालन होत आहे का, याचीही माहिती जमा केली जात आहे. अलिकडेच दहावी आणि बारावीचे वर्ग पूर्ण प्रमाणात भरविण्यात येत आहेत. दहावी परीक्षेचे तात्कालिक वेळापत्रकही प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची हजेरी वाढल्याचे दिसून आले आहे. लवकरच अंतिम वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.