वार्ताहर / हुपरी
झालेल्या अवकाळी जोरदार पावसामुळे ऊसतोड मजुरांच्या झोपड्यात पाणी शिरल्यामुळे संसार उपयोगी वस्तू भिजून चिंब व सर्वांचे मोठे हाल झाले आहे.आम्हाला आमच्या गावी सोडा ,नाहीतर निघून जाणारच असे म्हणत कारखान्याच्या गेटजवळ गोळा होऊन आरडा ओरड करून आक्रोश केला. सध्या सर्वत्र ऊस गळीत हंगाम संपला असून देखील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जवाहर साखर कारखान्यावर लॉकडाऊन झाल्यामुळे परिसरात अनेक ठिकाणी झोपडया मारून मजूर कुटूंबासह राहत आहेत. कारखान्याच्या जवळ टोळ्यात असलेले5284लोक अडकून पडले आहेत.गावाकडे त्यांचे आई वडील, लहान, लहान मुले सोडून आल्याने त्यांची उपासमार होत आहे.
काल वळीव पावसाने झोडपल्याने पावसाचे पाणी त्यांच्या झोपंड्यात शिरल्यामुळे अनेक कुटूंबाचे हाल झाले. काम नाही, धंदा नाही बसून जीवन जगणे कठीण झाले आहे.आम्हाला या ठिकाणी राहायाचे नाही, गावी जाणारच असे म्हणत 1200 ते 1500 लहान मुले, महिला व पुरुष जवाहर कारखान्याच्या गेटवर आले. आम्हाला सोडा, गावी जाणार आहे असे म्हणत आरडा ओरड करत आक्रोश करून संबधित अधिकाऱ्यांना विनवणी करू लागले.
ऊसतोड टोळ्यातील महिलांसह इतर गावी जाणारच असा हट्ट धरून आक्रोश करत होते. यावेळी कारखान्याचे अधिकारी हतबल झाले काही करावे सुचेनासे झाले. कारखाना प्रशासनाने पोलिसांना बोलावले त्यावेळी हुपरी पोलीस आले. त्यावेळी टोळ्यातील जबाबदार व्यक्तीने सांगितले की आम्हाला पुरेसा अन्नसाठा मिळत नाही, जनावरांना चारा नाही, राहण्यासाठी निवारा नाही, कोणताही काम, धंदा नाही, गावाकडे आमचे वयस्कर लोक व लहान लहान मुले आहेत. त्यांची उपासमार होत आहे. म्हणून गावी जातो सोडा अशी विनंती करीत आहोत तरी देखील सोडत नाहीत. त्यावेळी राजेंद्र मस्के यांनी कारखाना प्रशासनाला यांना लागणारे अन्नधान्य, भाजीपाला, जनावरांना चारा वेळेत देण्यास सांगितले व सर्व टोळ्यातील मजुरांना सांगितले की महाराष्ट्र राज्य ऊसतोडणी व वाहतूक संघटनांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे घरी सोडावे म्हणून निवेदनाद्वारे मागणी केली आहे. तरी आपण थोड्याच कालावधीत घरी जाणार आहात याची दक्षता घ्यावी असे सांगत प्रत्येकांना आपापल्या झोपड्यात पाठविले.