ऑनलाईन टीम / मुंबई :
ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या हातात कोयत्याऐवजी पुस्तके यावीत, यासाठी ऊसतोड महामंडळाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार आहेत. तसेच या मुलांच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यासोबत संत भगवान बाबा वसतिगृह योजनेच्या माध्यमातून 20 वसतिगृहे भाडय़ाच्या जागेत सुरू करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
सामाजिक न्याय भवन परिसरातील लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाचे उद्घाटन मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्हर्च्युअल पद्धतीने केले. त्यावेळी ते बोलत होते. ठाकरे म्हणाले, ऊसतोड कामगार ऊन, पाऊस थंडी याचा विचार न करता मेहनत करतात. ऊसतोड करण्यासाठी त्यांना कुटुंबासह गावोगावी फिरावे लागते. त्यामुळे त्यांच्या मुलांना शिक्षण घेणे गैरसोयीचे होते. या मुलांना शिक्षासाठी प्रोत्साहित करण्यासाठी ऊसतोड महामंडळाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार आहेत. तसेच या मुलांसाठी संत भगवान बाबा वसतिगृह योजनेच्या माध्यमातून 20 वसतिगृहे भाडय़ाच्या जागेत सुरू करण्यात येणार आहेत. ऊसतोड कामगारांना शासकीय योजनांचा लाभ घेता यावा यासाठी त्यांना ओळखपत्र देण्यात येणार आहे. तसेच त्यांच्या माताभगिनींच्या आरोग्याचे प्रश्न सोडविण्यासाठीही प्रयत्न करण्यात येणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव सुमंत भांगे, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक तथा समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे आदी उपस्थित होते.