मोबाईलधारकांच्या तक्रारींमध्ये वाढ,कंपनीकडून अद्याप सेवेत सुरळीतपणा नाही
प्रतिनिधी / रत्नागिरी
गेल्या 8-10 दिवसापासून रत्नागिरीतील एअरटेल सीमकार्ड मोबाईलधारकांच्या तक्रारीत वाढ झाली आहे. अचानक सिम डिसेबल होत असल्याने मोबाईल बंद पडू लागले आहेत. या बाबत येथील एअरटेल कस्टमर सर्व्हीसकडे विचारणा केली असता या सर्व तक्रारी आपण एअरटेल कंपनीला मेल केल्या आहेत. यात आपण काही करू शकत नाही. नवीन सिम घ्या, असे सांगितले जात आहे. एअरटेलच्या या सेवेबाबत सीमकार्ड धारकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. एअरटेल सीमधारकांची मोबाईल सेवा अचानक खंडित होवू लागल्याने ग्राहकांनी एअरटेल कस्टमर केअर सेंटरला भेट दिली असता यात आपण काही करू शकत नाही, मात्र या तक्रारी आपण मेल केलेल्या असल्याचे सांगितले गेले. सीम बंद पडल्यानंतर नवीन सीम घ्यावे लागत आहे. यासाठी पुन्हा 50 रूपयाचा भुर्दंड ग्राहकांकडून घेतले जात आहेत. रत्नागिरीत जवळपास 10 ते 20 टक्के ग्राहकांच्या या बाबत तक्रारी असल्याची माहिती एअरटेल सर्व्हीसकडूनच समोर आली आहे.