नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरुवारी संविधान दिनाच्या निमित्ताने ऑल इंडिया प्रिसाइडिंग ऑफिसर्स कॉन्फरन्समध्ये भाषण केले. यावेळी त्यांनी लोकसभा आणि सर्व विधानसभांच्या निवडणुका एकाचवेळी घेण्याचे समर्थन केले. ‘एक देश, एक निवडणूक’ ही देशाची गरज असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. तसेच संविधान दिनाचे औचित्य साधून ‘बापूंची म्हणजेच महात्मा गांधींची प्रेरणा आणि सरदार वल्लभभाई पटेलांची कटिबद्धता यांच्यासमोर माथा झुकवण्याचा आजचा दिवस आहे,’ असेही ते म्हणाले. पाच वर्षांपूर्वी 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात पाकिस्तानचे नाव घेत त्यांच्यावर थेट शाब्दिक हल्ला चढवला. पाकिस्तानने पाठवलेल्या दहशतवाद्यांनी याच दिवशी 2008 साली मुंबईवर हल्ला केला होता. या हल्ल्यात अनेक भारतीय आणि परदेशी नागरिक मृत्युमुखी पडले. मी या हल्ल्यात हुतात्मा झालेल्या त्या सर्वांना तसेच पोलीस आणि सुरक्षादल कर्मचाऱयांना श्रद्धांजली अर्पण करतो. आजचा भारत 26/11 चा दहशतवादी हल्ला कधीही विसरू शकत नाही, कारण हा भारताच्या भूमीवरील सर्वात मोठय़ा दहशतवादी हल्ल्यांपैकी एक होता, असे सांगत आजचा भारत नव्या नीतीसह आणि रितीसह दहशतवादाचा सामना करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
संविधानाचे जोरदार समर्थन
1970 च्या दशकात अधिकारांच्या वितरणाची यंत्रणा उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न झाला, मात्र या प्रयत्नाचे उत्तरही संविधानानेच दिले. आणीबाणीनंतर देशातील टेहळणीच्या यंत्रणा मजबूत झाल्या. कार्यकारी मंडळ, कायदेमंडळ आणि न्यायपालिका या तिन्ही स्तंभांना या काळात अनेक धडे मिळाले आणि त्यांची प्रगती झाली. 130 कोटी भारतीयांनी प्रगल्भता दाखवली आहे आणि यामागचे सर्वात महत्त्वाचे कारण आहे संविधानाच्या या तीन स्तंभांवरील त्यांचा विश्वास हेच असल्याचे प्रतिपादनही मोदींनी संविधानाबाबत बोलताना केले.
‘एक देश, एक निवडणूक’
लोकसभा, विधानसभा आणि पंचायतीच्या निवडणुकांसाठी एकच सामायिक मतदारयादी तयार करण्याची योजनाही पंतप्रधानांनी आपल्या भाषणात बोलून दाखवली. देशात काही महिन्याच्या अंतराने निवडणुका होत असल्याने देशाच्या विकासावर त्याचा परिणाम होतो. काही महिन्यात कोणत्या तरी एका राज्यात निवडणुका असल्याने त्याचा परिणाम विकासकामावर होतो हे आपल्या सर्वांना माहिती आहे. यासाठी वन नेशन-वन इलेक्शन वर गंभीर अभ्यास आणि चर्चा करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.