प्रतिनिधी / फोंडा
विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या दहावी परीक्षा कोरोना लॉकडाऊनमुळे विलंबाने सुरू होऊन काल सोमवारपासून संपल्या. गोवा शालांत मंडळाच्या परीक्षेसाठी पहिल्यांदाच गोवा, महाराष्ट्र व कर्नाटक अशा तीन राज्यातील परीक्षा केंदावर आयोजन करण्यात आले होते. परीक्षा सुरळीत पार पडल्यामुळे मुख्यमंत्र्यासह बालक-पालकांनीही सुटकेचा श्वास घेतला आहे. एकदाची दहावी बोर्डाची परीक्षा झाली, पालकही सुखावले तर बालक बिनधास्त झाले आहेत आता केवळ प्रतिक्षा निकालाची अशी प्रतिक्रिया काही पालकांनी व्यक्त दिली आहे.
कोरानाच्या सावटामुळे परीक्षास्थळावर ना पालकांची ना विद्यार्थ्यांची लगबग दिसली. ऐरवी परीक्षास्थळावर पोहोचण्यापासून ते पेपर सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना नेण्यासाठी पालकांची उडालेली झुंबड अशी अवस्था प्रत्येक परीक्षा केंदावर पाहायला मिळायची. कोरोनामुळे सामाजिक अंतर पाळून दहावीच्या परीक्षा विना विध्न पार पाडल्याचे स्मितहास्य मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनाही झाले असेलच त्याहूनही अधिक मागील दोन महिनाभरापासून मानसिक तणावाखाली असलेल्या बालक-पालक तणावमुक्त झाले आहे. दहावीच्या मुख्य पेपराची परीक्षा कालपासून संपुष्टात आली असून ऑपन स्कूलिंगसाठी असलेल्या कुकरी व इतर विषयांसाठी 6 जूनपर्यंत ही परीक्षा चालणार आहे.
इतिहासात पहिल्यांदा 3 राज्यातून घेतली परीक्षा
दहावीसाठी एकूण 219680 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यात 9890 मुली तर 9790 मुलगे आहेत. 29 केंद्रातून एकूण 1620 वर्गामध्ये परीक्षा घेण्यात आल्या. एका परीक्षागृहात केवळ 12 विद्यार्थ्यांची सोय करण्यात आली होती. गोवा शालांत मंडळाच्या इतिहासात पहिल्यांदा महाराष्ट्रातील सिंधुदुर्गात 4 ठिकाणी तर कर्नाटकात 2 अशा एकूण 6 केंदाची व्यवस्था करण्यात आली होती. एकूण 200 मुले या केंदातून थेट परीक्षा दिली.
राज्याबाहेर आरोंदा, सातार्डा, दोडामार्ग, आयी, चोर्ला, माजाळी या भागात उपकेंद्रे होती. दहावीच्या परीक्षेतील प्रश्नामुळे सरकार कोंडीत सापडले खरे मात्र पेपर सेट केलेल्या चारजणांवर कारवाईचे आदेश दिल्यानंतर हे वादळ शमले व त्यानंतर सर्व पेपर सुरळीतपणे पार पडले. दहावीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पुष्कळ अवधी मिळाल्याने यंदा निकाल बंपर लागणार असल्याची चिन्हे दिसत आहे.
विद्यार्थी झाले बिनधास्त, पालकही सुखावले
मागील दोन महिन्यापासून मोबाईलवरील गेम खेळणे थांबविले होते. तसेच इतर मैदानी खेळावरही बंधने होती. सद्या अनलॉक फेज सुरू असल्यामुळे बरीच शिथीलता मिळणार असल्यामुळे मुलेही जाम खुषीत आहे. परीक्षा संपल्यामुळे आनंद द्विगुणीत झालेला असल्याची प्रतिक्रीया काही पालक व विद्यार्थ्यांनी दिली.
परीक्षा व्यवस्थित पार पडल्यामुळे काही पालकांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे खास आभार मानले आहे. राज्यातील प्रत्येक पालक प्रचंड तणवाखाली होता. दहावीच्या परीक्षा होणार की नाही?याची शाश्वती नसल्यामुळे पालकांसह विद्यार्थी चिंतेत होते. परीक्षा होणार असे कळल्यानंतर चिंता विसरून अभ्यासाला लागलेल्या मुलांनी केवळ गणितांचा विषय कठिण गेल्य़ाची प्रतिक्रीया दिली आहे. तरीही 90 टक्के गुण मिळणारच असा ठाम विश्वास व्यक्त केला आहे.